महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।५ डिसेंबर। प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी ‘काश्मीर फाइल्स’चित्रपटावर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रमुख ज्युरींनीच टीका केल्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच काश्मीरमध्ये घडलेल्या घटना आणि त्यावर राजकारण्यांनी दिलेले प्रतिसाद यावरही भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत काश्मीरमध्ये अत्याचार झालेल्या काश्मिरी पंडितांचं स्वागत करणारे ते एकमेव राजकारणी होते, असं मत व्यक्त केलं. ते शनिवारी (३ डिसेंबर) एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या मुलाखत कार्यक्रमात बोलत होते.
अनुपम खेर म्हणाले, “महाराष्ट्रात महाविद्यालयांमध्ये काश्मीरचे विद्यार्थी येऊन आपलं दुःख सांगत होते आणि महाराष्ट्रातील छोट्या गावांपर्यंत ते गेले होते. इथपर्यंत काश्मीरमध्ये काय होतंय ही जागृती होती. कारण बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी म्हटलं होतं की या सर्वांचं स्वागत आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठांमध्ये टाका, राहण्यासाठी जागा द्या.”
“आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे आभारी आहोत”
“आम्ही त्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे आभारी आहोत. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना काश्मिरी पंडितांविषयी माहिती आहे,” असं अनुपम खेर यांनी सांगितलं.