सुशांतसिंह, दिशा सालियन प्रकरणावरून भाजपचे दोन आमदार आक्रमक; ठाकरे गट अडचणीत?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ डिसेंबर । दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. तर ठाकरे गट बॅकफूटवर गेले आहेत. दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं मत एका डॉक्टराने व्यक्त केलं होतं. तोच धागा पकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रसाद लाड यांनी या प्रकरणी त्या डॉक्टरांचं ताबडतोब स्टेटमेंट नोंदवलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. तसेच आता मोठ्या घडामोडी घडतील असं सूचक विधान प्रसाद लाड यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दिशा सालियान प्रकरणी तात्काळ डॉक्टरांचे स्टेटमेंट घेतलं पाहिजे. दिशाची हत्या करण्यात आल्याचं एका डॉक्टरांचं मत होतं. त्यामुळे त्या डॉक्टराची साक्ष नोंदवून घेतली पाहिजे. तसेच या प्रकरणी योग्य तो खुलासा झाला पाहिजे, असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

दिशा सालियन प्रकरणात ज्यांचा सहभाग आहे त्यांना अटक केली पाहिजे. दिशा सालियनचे मारेकरी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्यासमोर आले पाहिजेत. जे कोणी आरोपी असतील, ते कुणीही असू देत, त्यांची नावे जाहीर केली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अखेर एका जीवाचा हा प्रश्न आहे, असं पडळकर म्हणाले.

संजय राऊत आज नागपुरात मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राऊतांना येऊ द्या. काही करू द्या. आम्हाला काही फरक पडत नाही. काही बॉम्बस्फोट वगैरे होणार नाहीये. बॉम्बस्फोट ऑलरेडी झालेला आहे आणि ज्यावेळी होईल, त्यावेळी आम्ही आमची बाजू मांडूच. संजय राऊतांना आता तसंही काही काम राहिलेले नाहीये, असा टोला पडळकर यांनी लगावला.

आमदार प्रसाद लाड यांनीही दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरे गटाला घेरलं. या प्रकरणामध्ये आता एसआयटी नेमण्यात आलेली आहे. डॉक्टरांनी जे स्टेटमेंट दिले आहे, ते अतिशय गंभीर आहे. या स्टेटमेंटची दखल घ्यायला पाहिजे. पोलिसांनी आता तातडीने हत्येच्या मार्गाने तपास केला पाहिजे, असं प्रसाद लाड म्हणाले.

उद्धव ठाकरे हे आता बाहेर पडू लागलेत. अंगाशी आल्याने आता बाहेर पडू लागलेले आहेत. कारण सत्य काय आहे ते आता समोर येत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला वाटतं की कूपर हॉस्पिटलचा रिपोर्ट आता बाहेर पडलेला आहे. सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे समजत आहे. त्यामुळे आता मोठ्या घडामोडी घडतील, असा दावाही लाड यांनी करून खळबळ उडवून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *