इंद्रायणी नदीमध्ये केमिकलयुक्त सांडपाणी सोडणाऱ्या 6 कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० जानेवारी । इंद्रायणी नदीमध्ये केमिकलयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे नदीतील प्रदूषण वाढल्याच्या अनुषंगाने जल निःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर महाजन, कनिष्ठ अभियंता स्वामी जंगम यांनी चिखली परिसरात पाहणी केली. इंद्रायणी नदीमध्ये केमिकलयुक्त सांडपाणी सोडणाऱ्या 6 कंपन्यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाहणी ड्रम मारूती लोंढे, क्वालिटी कोटींग वर्क्स शेलरवस्ती, चिखली, कुमार मोहन प्रजापती डायनॅमिक प्लॅस्टिक इंडस्ट्रीज शेलारवस्ती, चिखली, मोरेश्वर मुंगसे ओम इंडस्ट्रीज, शेलारवस्ती चिखली, सचिन साठे वरद इन्फोटेक शेलारवस्ती चिखली, सुरेश अग्रवाल हरीदर्शन प्रा.लि. शेलारवस्ती, चिखली आणि विश्वेश देशपांडे टेक्सेव्ही मेकॅनिकल , शेलारवस्ती चिखली या उद्योजक कंपन्यांचे सांडपाण्याच्या पाईपचे कनेक्शन, जलनि:सारण विभागाची कोणतीही परवानगी न घेता महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनला जोडल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच, पुढील आठवड्यात सुद्धा या भागात तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, मिळकतींचे सांडपाणी/ रासायनिक सांडपाणी विनापरवाना महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनला जोडल्याबद्दल या व्यावसायिकांच्या विरोधात महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम 186 (1) (क) नुसार (Chikhali News)चिखली पोलीस ठाण्यात FT.R. / फिर्याद नोंदविण्यात आली आहे. तसेच, काही ठिकाणी महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनमधून गळती होत असलेली ठिकाणे शोधून दुरुस्ती करण्याचे काम जलनि:सारण विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनला कोणत्याही मिळकतीचे ड्रेनेज कनेक्शन करण्यापूर्वी नोदणीकृत प्लंबरच्या मार्फत नागरी सुविधा केन्द्रामध्ये परवानगी घेणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये रासायनिक सांडपाणी जोडणे बेकायदेशीर आहे. सदर उद्योजकांना पर्यावरण कायद्यान्वये सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रीया न करता सोडत असल्याबद्दल पर्यावरण कायद्याचे अनुषंगाने नोटीसा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सदर भागात भेट देवून प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करण्याबाबत पाऊल उचलले आहे. क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे यांनी या उद्योजकांना अनाधिकृत/ विनापरवाना बांधकामाचे अनुषंगाने सदर विनापरवाना बांधकामे काढून टाकणेसाठी नोटीसा दिल्या आहेत.

इंद्रायणी नदीच्या काठी भराव करून अनाधिकृत शेड, इमारती बांधणेचे काम बेकायदेशीरपणे चालू आहे. हे विनापरवाना बांधकामे, शेड बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात F.I.R./ फिर्याद नोंदविण्यात येईल. तसेच विनापरवाना बांधकाम तोडण्यात येतील. नागरीक, उद्योजकांनी कोणत्याही प्रकारचे विनापरवाना बांधकाम करू नये. बांधकाम करण्यापूर्वी रितसर परवानगी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करणेत येईल, याची नोंद घ्यावी, अशी माहिती सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *