महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – राज्यात चौथ्या लॉकडाऊनची सुरूवात झाली असून त्यामध्ये नवे नियम देखील जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार रेड झोन आणि नॉन रेड झोन अशा पद्धतीने राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. मात्र, नव्या नियमांनुसार ज्या ठिकाणी ज्या बाबींची सूट देण्यात आली आहे, त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं फार गरजेचं आहे, अशी भूमिका राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली आहे. ‘कोविडसोबत राहायचंय, तर सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागेल. मास्कचा नियमित वापर, स्वच्छता, हात वारंवार धुणं, थर्मल स्कॅनिंग ठेवणं गरजेचं आहे, सॅनिटायझरचा वापर केला गेला पाहिजे. लग्नकार्य किंवा अंत्यसंस्कार अशा ठिकाणी ५० हून जास्त लोक असू नयेत’, असं ते म्हणाले आहेत. सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संपर्क साधला.