महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – भाजपकडून येत्या २२ तारखेला राज्य सरकाराच निषेध करण्यासाठी ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांनी भाजपचा समाचार घेतला. राज्य संकटात असताना भाजपला ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना सुचतेच कशी, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले की, स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन करोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त करोना योद्ध्यांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे.
अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपाचं काहीही भलं होणार नाही. उलट त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत अडथळा निर्माण होईल. त्यामुळे आता जनताच महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा हा डाव हाणून पाडेल, असे अजित पवार यांनी म्हटले. त्याऐवजी भाजपने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे. महाराष्ट्राविरुद्धच्या कटाचा भाग बनण्याचं पाप माथी घेऊ नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.