महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ फेब्रुवारी । महाराष्ट्रात मागच्या वर्षी सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांनी शिंदे गटाला डिवचण्यासाठी “५० खोके, एकदम ओके” ही घोषणा द्यायला सुरुवात केली. या घोषणेमुळे सुरुवातीला शिंदे गटाने आक्रमक प्रतिक्रिया दिली. मात्र आता शिंदे गट देखील या घोषणेला गांभीर्याने न घेता विनोदाचा भाग म्हणून घेत असल्याचे दिसत आहे. जळगाव येथे झालेल्या एका जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांनी खोक्यांवरुन विरोधकांवर निशाणा साधला. ठाकरे गटावर टीका करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “पाच, पंधरा जण १५ बोंबलत होते खोके खोके.. अबे साले बोके हो.. आम्ही तर पक्के खोकेवाले आहोत. काय बोलायचं ते बोला.”
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
“आजच्या सभेला जमलेली गर्दी ही निवडणुकीच्या प्रचारासाठी जमलेली गर्दी नाही. मघाशी गिरीश महाजन यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या कामावर प्रेम करणाऱ्यांची ही गर्दी आहे. लोक आमच्यावर लई टीका करतात. पाच, पंधरा जण १५ बोंबलत होते खोके खोके.. अबे साले बोके हो.. आम्ही तर पक्के खोकेवाले आहोत. काय बोलायचं ते बोला. आज मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघात ३७० खोके आम्हाला दिले. राष्ट्रवादीला सांगा. आम्ही जे बंड केले, जो उठाव केला, तो जनतेच्या कामाकरिता केला, भगव्यासाठी केला.”, अशी शब्दात गुलाबराव पाटील यांनी खोक्याचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, हे भुंकणार, त्यांना भुंकूद्या. हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार. त्यांची चिंता करायची नसते. आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ. आमचं तर आव्हान आहे, कुठल्याही मतदारसंघात या. जो जो आम्हाला आडवा येईल, त्याचा सत्यानाश होवो.
आम्ही खोके घेतले, घरात जमा नाही केले – मुख्यमंत्री
जळगावच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील खोक्यांवरुन विरोधकांना टोला लगावला. खोक्यांवरुन बोलत असताना ते म्हणाले, “विरोधक आरोप करत असतात. त्यांच्याकडे दोनच शब्द आहेत, तिसरा शब्दच नाही. गुलाबराव पाटलांना सरकारच्या वतीने २७० खोके दिले. चिमणआबाला ११५ खोके दिले. खोके घेतले, घरात जमा नाही केले; आम्ही दिले.”