येत्या काही दिवसात राजकारणात स्फोटक घडामोडी ; PM मोदींना पायउतार व्हावे लागू शकते ; संजय राऊतांनी ‘त्या’ विधानाकडे वेधले लक्ष

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ फेब्रुवारी । भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी केलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटाच्या मालिकेनंतर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून त्यावर भाष्य करण्यात आले आहे. स्वामी यांच्या वक्तव्यांचा दाखला देत २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागू शकते, या भाकिताकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सामना’तील रोखठोक या सदरातून राऊतांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. डॉ.सुब्रमण्यम स्वामी हे हवेत तीर मारणारे नेते नाहीत. जगभरातील यंत्रणांशी त्यांचा संवाद आहे, त्यामधून ही माहिती समोर आली आहे. ‘द गार्डियन’ने प्रसिद्ध केलेली हेरगिरी आणि निवडणूक हेराफेरीची माहिती व डॉ. स्वामी यांनी टाकलेला नवा बॉम्ब यांची सांगड घालणे गरजेचे आहे. गार्डियन वृत्तपत्राने अनेक स्फोट केले. २०२३च्या मध्यास वॉशिंग्टनमधून आणखी स्फोट होतील व पंतप्रधान मोदींना जावे लागेल, असे भाकीत सुब्रमण्यम स्वामींनी वर्तविल्याचे ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याची चर्चा आहे. अदानी प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील नरेंद्र मोदी यांची पत घसरली आहे. त्यात बीबीसीच्या छाप्यानंतर चित्र बरेच बदलले आहे. मोदींची लोकप्रियता हा केवळ एक फुगा आहे. लोकशाहीच्या मुखवट्याआडून ते हुकूमशाहीच चालवत आहेत, यावर जगात चर्चा सुरु झाली आहे. द गार्डियन वृत्तपत्राने यासंदर्भात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, देशातील विरोधकांचा आवाज दाबवण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. विरोधकांना शरण आणण्यासाठी इस्रायलमधील एका कुख्यात डिटेक्टिव्ह कंपनीची भारतात मदत घेतली जात आहे. ही कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते. ही कंपनी सोशल मीडियाचा वापर करुन द्वेष, धर्मांधतेचे विष पसरवत आहे. या कंपनीने ईव्हीएम हॅक करुन भाजपच्या पराभवाचे रुपांतर विजयात केले. भाजपचे नेते आम्ही लोकसभेच्या ४०० जागा जिंकू, असे म्हणतात. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. इस्रायलमधील या कंपनीच्या माध्यमातून जगभरातील ३० निवडणुकांवर प्रभाव टाकण्यात आला होता, असेही ‘गार्डियन’च्या रिपोर्टमध्ये नमदू करण्यात आल्याचे ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, प्रमुख राजकीय नेते व उद्योगपतींवर आजही ‘पेगॅसस’च्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे. संघ परिवाराशी संबंधित भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक मागणी पुन्हा केली. ते म्हणतात, “पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना तात्काळ पदावरून हटवले पाहिजे. त्यांनी अनेकदा मूर्ख बनवले आहे. पेगॅसस टेलिफोन टॅपिंग हे त्याचे उत्तम उदाहरण. वॉशिंग्टनमधून डोवाल यांचे आणखी एक भयंकर प्रकरण लवकरच उघड होणार आहे. मोदी यांनी वेळीच पावले उचलली नाहीत तर २०२३ च्या मध्यास मोदी यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *