महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ फेब्रुवारी । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दुसऱ्या टप्प्यातील सुनावणीला मंगळवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ठाकरे गटाचे वकील अॅड. कपिल सिब्बल यांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी झालेली निवडच चुकीची असल्याचा दावा केला.
त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी घेतलेले सर्व निर्णय, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी केलेली निवड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधीही नियमबाह्य आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. विधानसभा अध्यक्षांबाबत कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असल्याचे निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मांडले आहे. त्यामुळे आज घटनापीठासमोर ठाकरे गटाचे वकील आणखी कोणते मुद्दे मांडणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली, पी. नरसिंह या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सकाळी 11 वाजेपर्यंत सुनावणीला सुरूवात होण्याची शक्यता आहे.