लॉकडाउन टप्या टप्याने उठवणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई -करोना आटोक्यात येत नसल्याने सरसकट सगळीकडचा लॉकडाउन उठविण्याऐवजी हळूहळू लॉकडाउन शिथिल करण्याबाबतचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी मांडला. त्याला पवार यांनी दुजोरा दिला. मुंबईत सार्वजनिक वाहतूक सुरू करणे अयोग्यच असल्याच्या ठाकरे यांच्या मताशी पवार यांनी सहमती दर्शवली. मात्र, याव्यतिरिक्त इतर उद्योगधंदे मात्र तातडीने सुरू व्हायला पाहिजेत, असे मत पवारांनी मांडले. लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने आर्थिक नुकसान तर झालेच आहे, मात्र यामुळे सर्वसामान्यांचा धीरही सुटत चालला आहे. असे झाल्यास त्याला तोंड देणे अडचणीचे ठरेल, त्यामुळे शक्य तेवढे जनजीवन पूर्वपदावर आणण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील भेटीमुळे राज्यातील राजकारणाविषयी उलट सुलट चर्चा सुरू असल्या तरी प्रत्यक्षात या बैठकीत राजकीय खलबतांऐवजी प्रामुख्याने टप्प्या टप्प्याने मुंबई-पुणे तसेच राज्यातील इतर शहरातील लॉकडाउन कसा उठवता येईल त्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. करोनाचा धोका असला तरी विस्कळीत झालेले जनजीवन लवकर पुन्हा रुळांवर आणल्यावाचून पर्याय नसल्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचेही समजते.

करोना, लॉकडाउन आणि रेडझोन, नॉन रेडझोन यांमधील नियम यांत राज्यप्रशासन गेल्या काही दिवसांपासून व्यस्त असून एकीकडे लॉकडाउनच्या दिवसांनी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ पूर्ण केला असताना करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे. राज्यातील चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचा, छोट्या व्यापाऱ्यांचा तसेच नोकरदारांचा धीर सुटला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीविषयी प्रसारमाध्यमांना कोणतीही सूचना न देण्यात आल्याने या गुप्त भेटीविषयी मंगळवारी बरीच उलट सुलट चर्चा सुरू झाली. राज्यातील राजकारण पूर्णतः उलटे फिरणार ते राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार इथपर्यंतचे मुद्दे चर्चिले गेले. मात्र, प्रत्यक्षात राजकारणापेक्षा प्रामुख्याने जनजीवन सुरळीत करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.

करोनाच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने दैनंदिन व्यवहार सुरू करून राज्यातील नागरिकांच्या जीवाला असलेला धोका विनाकारण वाढविण्याऐवजी आणखी काही दिवस लॉकडाउन कायम ठेवता येईल का, या विचारात मुख्यमंत्री आहेत. पवार यांनी याविषयी माहिती घेतल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्याचे ठरवले. त्यानुसार सोमवारची भेट घडल्याचे कळते.

लवकरच राज्यात पावसाला सुरूवात होणार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही सुरू होणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील जीवनावश्यक वस्तू ,औषधे, भाजीपाल्याची दुकाने सोडली तर बाकीचे सर्व व्यवहार ठप्प आहेत. मुंबईत कामगारांची संख्या लाखोंच्या घरात असून परराज्यातील बहुसंख्य कामगार आपापल्या गावी परतण्याऐवजी आज ना उद्या व्यवहार सुरू होतील, या आशेवर मुंबईतच थांबले आहेत. या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *