IND vs AUS: निर्णायक वनडेत कसे असेल पिच, हवामान आणि प्लेइंग ११

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ मार्च । एकीकडे ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श भेदक मारा करत फलंदाजांची भंबेरी उडवत असताना भारताचा हुकमी फलंदाज सूर्यकुमार यादव मात्र अपयशी ठरतो आहे. हे चित्र बुधवारी रंगणाऱ्या वनडे मालिकेतील निर्णायक, तिसऱ्या वनडेत बदलेले अशी अपेक्षा आहे. मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. फलंदाजांचा कस बघणाऱ्या चेन्नईतील खेळपट्टीवर सूर्यासह अनुभवी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासारख्या फलंदाजांनाही स्टार्कला रोखण्यासाठी अतिरिक्त परिश्रम करावे लागतील.

टी-२०मध्ये सूर्या जवळपास बिनचूक खेळ करतो. ज्यात आक्रमकबाण्याचीही महत्त्वाची भूमिका असते. मात्र या वनडे मालिकेतील सलग दोन लढतींत तो पहिल्याच चेंडूवर माघारी परतला आहे. स्विंग आणि सीम यांचा सामना करताना समतोल साधायचा असेल तर चेंडू काहीसा उशीरा फटकावणे आवश्यक असते. सूर्यकुमार टी-२०मध्ये हा समतोल अचूक साधतो, पण वनडेमध्ये तो बॅट खूप लवकर पुढे का आणत विकेट गमावतो आहे. खरेतर श्रेयस अय्यर जायबंदी असल्याने मिळालेल्या संधीचे सोने करणे सूर्याच्या हाती आहे. तसे झाल्यास सूर्याचे वनडे वर्ल्ड कपमधील स्थानि निश्चित होईल. मात्र सूर्याच्या खेळात एकाग्रताच दिसत नाही.

जागतिक क्रिकेटमधील दोन सर्वोत्तम संघ, ज्यांची फलंदाजी अगदी अखेरच्या क्रमांकापर्यंत पसरली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तरीदेखील या मालिकेतील पहिल्या दोन लढतींमध्ये फलंदाजांना छाप पाडता आलेली नाही. दोन्ही लढतींमध्ये वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व राखले होते. या मालिकेच्या निमित्ताने भारतातील वनडेंत तुरळक असे चित्रही दिसले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना दोनशे धावाही करता आल्या नाहीत! दुसऱ्या विशाखापट्टणम वनडेमध्ये मिचेल स्टार्कने भारतीय फलंदाजांना अक्षरशः नाचविले. वनडे कारकिर्दीत त्याने नवव्यांदा पाच मोहरे टिपण्याची किमया केली. त्य़ात सीन अॅबॉट आणि नॅथन एलिस यांनी मिळून पाच मोहरे टिपल्याने भारताचा डाव ११७ धावांत संपुष्टात आला. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या फटकेबाजीमुळे ११ षटकांतच पार केले.

चेन्नईत स्टेडियम प्रेक्षकांनी तुडूंब होण्याची शक्यता अधिक असून प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांचे कामगिरी उंचावण्याचे लक्ष्य असेल. मात्र इथे त्यांचा कस तर लागणार, कारण चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना सहाय्यक असून फलंदाजांना बरेच कष्ट घ्यावे लागतात.२०१९नंतर चिदंबरमवर वनडे झालेली नाही. ऑस्ट्रेलियाची अखेरची वनडे येथे २०१७मध्ये झाली होती अन् त्यातही पावसाने खो घातला होता.

यंदा ऑगस्टमध्ये भारतीय संघ कॅरेबियन दौऱ्यावर वनडे खेळणार असून त्याआधीची ही टीम इंडियाची अखेरची वनडे आहे. हे वनडे वर्ल्ड कपचे वर्ष आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे या लढतींचा अधिकाधिक फायदा उठवणे महत्त्वाचे आहे. स्टार्कच्या माऱ्याची धार अधिक तीव्र असल्याने रोहित आणि कंपनीला पूर्ण तयारीनिशी उतरावे लागणार आहे हे निश्चित.

 

-ऑस्ट्रेलियाच्या दृष्टिने

वनडे वर्ल्ड कप पूर्वतयारीच्या दृष्टिने ऑस्ट्रेलियाला भारतीय खेळपट्टीवर स्पर्धात्मक सरावाची ही अखेरची संधी असेल. ऑक्टोबरमध्ये सरावाची मालिका खेळण्याचा त्यांचा विचार आहे. ऑस्ट्रेलियासाठीही पुढील वनडे मालिका ऑगस्टमध्ये असेल. त्यावेळी ते द. आफ्रिकेचा दौरा करणार आहेत. या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीस म्हणावी तशी संधी मिळालेली नाही. मालिकेतील पहिल्या वनडेत त्यांनी आक्रमक बाण्यासह फलंदाजी केली, पण यश फक्त मिचेल मार्शला लाभले. दुसऱ्या वनडेत मार्श-हेड य़ा जोडीनेच फलंदाजी केली.

IND vs AUS: निर्णयाक लढतीत पाऊस पडणार का? असे आहे पिच रिपोर्ट आणि रेकॉर्ड

भारत वि. ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे

ठिकाण : एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

वेळ : दुपारी १.३०पासून

प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टारवर

खेळपट्टीचा अंदाज : एकेकाळी चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना सहाय्य करायची. गेल्या काही मोसमांपासून ही खेळपट्टी स्पिनरना सहाय्यक ठरत असल्याचे दिसते. येथे पार पडलेल्या २२ वनडेंमध्ये आतापर्यंत अडीचशेच्या पार धावसंख्या गेलेली नाही.

हवामानाचा अंदाज : हवामान खात्याने चेन्नईत बुधवारी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शिवाय ढगाळ वातावरणही असेल, जे वेगवान गोलंदाजांना सहाय्य करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *