“बाळासाहेबांच्या सभेलाही जमली नव्हती, तेवढी गर्दी आम्ही जमवली”, तानाजी सावंतांचा दावा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ मार्च । आठ ते नऊ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. तेव्हापासून ठाकरे गट आणि शिंदे गट अशा शिवसेनेतील दोन गटांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान हल्लाबोल केला जात आहे. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा कुणाकडे? यावरूनही दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नुकत्याच केलेल्या एका दाव्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीमध्ये तानाजी सावंत यांचाही समावेश होता. नुकतंच त्यांनी “शिवसेनेच्या आमदारांचं बंडखोरीसाठी मतपरिवर्तन करण्यासाठी राज्यात तब्बल १५० बैठका मी घेतल्या”, असं विधान छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं होतं. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून तानाजी सावंत चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यातच आता त्यांचं हे विधानही व्हायरल होऊ लागलं आहे.

“जे ठाकरे, वाजपेयी, आडवाणींनाही जमलं नाही, ते…”
“२०१७मध्ये पंढरपुरात एक सभा आयोजित केली होती. आपला समाज असेल किंवा सोलापुरातील किंवा महाराष्ट्रातील जनतेला माहिती होतं की जे पटांगण आपण सभेसाठी घेतलं होतं, ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनाही भरलं नाही, आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही सभा झाल्या. त्यांनाही ते मैदान भरलं नव्हतं. आडवाणीजी यांनाही भरलं नव्हतं. ती किमया या पंढरीच्या नगरीत सावंत बंधूंनी २०१७-१८च्या दरम्यान सात लाख लोकांचा मेळावा भरवून करून दाखवली. हा इतिहास आहे. सावंत बंधूंच्या नियोजनामुळेच उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी जमली”, असं तानाजी सावंत म्हणाले आहेत.

“…तेव्हा सांगितलं की पुन्हा मातोश्रीची पायरी चढणार नाही”
दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या परंडा भागात आयोजित केलेल्या भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धेला तानाजी सावंत यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हा त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीबाबत भूमिका मांडली. “उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल नाकारला. भाजप-शिवसेना युतीला कौल दिलेला असतानाही शरद पवार यांनी त्यात मिठाचा खडा टाकला. आणि जनमत डावलून पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही मला स्थान दिले नाही. त्यामुळे मी मातोश्रीवर जाऊन त्यांनाही सांगून आलो की मी आता पुन्हा पायरी चढणार नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यातूनही उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दूर ठेवले. त्यामुळे संतप्त होऊन व आपण देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ३ जानेवारीला राज्यात पहिली बंडखोरी केली”, असं तानाजी सावंत म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *