महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी उच्चांक गाठला आहे. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. त्यातील सर्वाधीक 7358 रुग्ण एकट्या मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत राज्यभरात 26997 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 26997 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.
दरम्यान, शुक्रवारी कोरोनाच्या 2682 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सध्या राज्यात 33124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 62228, बरे झालेले रुग्ण 26997 तर आतापर्यंत 2098 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात 11 दिवस होता तो आता 15.7 दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 43.38 टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मान्सून उंबरठयावर उभा आहे, हे लक्षात घेता येणाऱ्या काळात कोरोनाशिवाय इतर साथरोग देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर अधिक काळजी घ्यावी लागेल, असेही संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने पूर्वतयारी सुरु आहे. हिवतापासाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे तर पाणी गुणवत्तेसाठी राज्यात स्वच्छता सर्वेक्षण सुरु आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनासाठी निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 2941 झोन क्रियाशील असून शुक्रवारी एकूण 17 हजार 600 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 67.68 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.