महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ एप्रिल । उन्हाळा आला की अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कडक उन्हातून फिरणे टाळावे, मात्र बाहेर जायचेच असेल तर संपूर्ण शरीर झाकेल असे सैल, सुती कपडे, डोळ्यांना सनग्लासेस असावेत. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे असते. उष्माघातापासून (heat stroke) बचाव करण्यासाठी आहारही योग्य असणे गरजेचे आहे. आहारतज्ज्ञांनी उन्हाळ्यामध्ये उपयुक्त ठरेल, अशा आहाराची माहिती दिलेली आहे…
पुदिना : पुदिन्याची ताजी पाने खाल्ल्याने उष्माघातापासून आराम मिळू शकतो. यामध्ये असलेले मेन्थॉल शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. यासोबतच उष्माघातापासूनही (heat stroke) बचाव होतो.
किवी : एका रिपोर्टनुसार किवीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होऊ शकते. यामध्ये असलेले पोटॅशियम उष्माघातापासून आराम देण्यास उपयुक्त आहे.
काकडी : कडक उन्हात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी काकडीचे सेवन जरूर करा. त्यात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम आणि मँगनीजसारखे पोषक घटक आढळतात. जे तुम्हाला उन्हाळ्यात फिट राहण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असलेले खाद्यपदार्थ जे केवळ शरीराला हायड्रेट ठेवत नाहीत तर पचनसंस्थेसाठीही फायदेशीर ठरतात.
कवठ सरबत : सरबत प्यायल्याने उष्माघातात आराम मिळतो. कवठ सिरपमध्ये भरपूर फायबर असते, ते पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
कलिंगड : कलिंगड या फळात पाण्याचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात कलिंगड, टरबूज यांसारख्या फळांचे सेवन करावे. तसेच कैरीचे पन्हे, ताक, नाचणीची आंबिल, उसाचा रस, नारळपाणी असे पेय पदार्थ घ्यावेत. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते.
मुगाची खिचडी : पचायला हलका व पाण्याचा घटक अधिक असलेला आहार घ्यावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे. संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, द्राक्षे इत्यादी फळांचे सेवन वाढवावे. थंड तुपाचाही आहारात समावेश करावा. उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा.