महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० एप्रिल । राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुका होत नसल्याने राज्यातील अनेक महापालिकांमध्ये प्रशासकही नेमण्यात आले आहेत. काही महापालिकांमध्ये तर दोन वर्षांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सध्या प्रशासक भरोसे चालला आहे. राजकारण्यांकडूनही या निवडणुकांबाबतची कोणतीच माहिती दिली जात नाहीये. मात्र, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. एवढेच नव्हे तर या निवडणुका कोणत्या महिन्यात होऊ शकतात याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदाच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
चंद्रकांत पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील? असा सवाल करण्यात आला. त्यावर आज त्याबाबत सुनावणी आहे. पण मला अजूनही वाटतं की या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदाच्याच वर्षी म्हणजे ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.