सत्तेसाठी नवी खेळी? :आधी राहुल गांधींना सुनावले, आता उद्धवबाबतही नाराजी, शिंदेंचे 16 आमदार अपात्र ठरल्यास भाजपला पाठिंब्याची चर्चा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ एप्रिल । स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान, मोदींची पदवी, अदानींची जेपीसी चौकशी, ईव्हीएम या मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व उद्धव सेनेशी विसंगत भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीत दुफळी निर्माण झाली. शिवसेनेत फूट पडल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी ‘बी प्लॅन’वर काम करत आहे. शरद पवारांची भाजप अनुकूल भूमिका हा त्याचाच भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पवार याचे खंडन करत असले तरी मित्रपक्षांना मात्र त्यांच्या खेळीची धास्ती वाटतेय. यापूर्वी सावरकरांच्या मुद्द्यावर पवारांनी राहुल गांधींचे कान टोचले, आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडताना आम्हाला विचारले नव्हते, अशी वक्तव्ये करून पवार आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आणत आहेत.

सुप्रीम कोर्टाकडे लक्ष

– ‘नागालँड पॅटर्न’ची आता महाराष्ट्रात पुनरावृत्ती शक्य

-एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सुप्रीम कोर्ट याबाबत लवकरच निर्णय देईल.

-जर हे आमदार अपात्र ठरले तर शिंदेंना मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल. तसेच युतीचे संख्याबळ घटेल. अशा परिस्थितीत अडचणीत येणाऱ्या भाजपला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे येऊ शकते.

-फडणवीसांना मुख्यमंत्री बनवून शिंदेसेना, राष्ट्रवादी सत्तेत राहतील.

-नागालँडमध्ये भाजप व एनडीपीपी यांना राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्याची पुनरावृत्ती राज्यात शक्य.

-मोदींची पदवी, अदानींच्या जेपीसी चौकशीसाठी काँग्रेस व उद्धव सेना आक्रमक. पण पवारांनी ते अयोग्य ठरवून भाजपधार्जिणी मते मांडली.

शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत गोपनीय चर्चा

भाजपला अनुकूल वक्तव्ये करणाऱ्या शरद पवारांच्या खेळीमुळे अस्वस्थ झालेले उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्रीच ‘सिल्व्हर ओक’वर धाव घेतली. तिथे उद्धव, शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे व संजय राऊत या चौघांमध्ये सुमारे सव्वा तास खलबते झाली. यातील चर्चेचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला असला तरी चर्चेचा अजेंडा वादग्रस्त मुद्द्यांबाबतचाच असल्याची माहिती दोन्ही पक्षांतील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेसचा सहभाग नव्हता. राज्यात मविआच्या सात वज्रमूठ सभा होणार आहेत. यापैकी दुसरी सभा १६ एप्रिलला नागपुरात होईल. त्या सभांमधून आघाडीची एकसंघ भूमिका दिसायला हवी. मतभिन्नता निर्माण होणारे विषय टाळायला हवेत, अशी अपेक्षा ठाकरेंकडून व्यक्त करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पहिल्या वज्रमूठ सभेत झालेल्या चुका यापुढे टाळण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही चर्चा झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सभांपासून दूर राहत आहेत. यासंदर्भात शरद पवारांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना बोलावे, अशी गळ उद्धव ठाकरेंनी घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *