महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ एप्रिल ।जळगाव ; सोने- चांदीमध्ये सुरू असलेली भाववाढ कायम असून, शुक्रवारी पुन्हा सोन्याच्या भावाने नवा विक्रम नोंदवीत ते ६१ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. चांदीच्याही भावाने दोन वर्षे आठ महिन्यांनी पुन्हा एकदा ७७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर झेप घेतली आहे. अक्षयतृतीया सणाला आठवडा शिल्लक आहे. त्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेली भाववाढ ‘अक्षय’ असून, याचा बाजारावर कोणताही परिणाम नसल्याचे
चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्यात गुंतवणूक वाढत असल्याने फेब्रुवारी महिन्यापासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अमेरिकन बँकांची स्थिती व वेगवेगळ्या देशांमधील राष्ट्रीय बँकांनी सोने खरेदी सुरू केली. या सोबतच शेअर बाजारात सुरू असलेल्या चढ- उतारामुळे सोन्याचे भाव वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यात चांदीलाही मागणी वाढू लागल्याने तिचेही भाव वाढत आहेत.
चांदीचा पुन्हा उच्चांक
सोन्याबरोबरच चांदीचेही भाव एक हजाराने वधारले व ती ७७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. यापूर्वी ७ ऑगस्ट २०२० रोजीदेखील चांदी ७७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर होती.
त्यानंतर मात्र एकाच दिवसात तिच्यात १२ हजार रुपयांची घसरण झाली होती. मात्र, आता
पुन्हा भाववाढ सुरू होऊन ती दोन वर्षे आठ महिन्यांनंतर पुन्हा एकदा ७७ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे.