महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राजकीय भूकंप? आज मविआ चे पुन्हा दोन बडे नेते भेटणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ एप्रिल । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल मे च्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधला आमदारांचा मोठा गट नाराज असून तो सत्ताधाऱ्यांसोबत जाईल, असं बोललं जात आहे. दोनच दिवसांपूर्वी या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या दोन बड्या नेत्यांच्या भेटीनंतर आता आज नागपुरात संजय राऊत हे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार आहेत.

राऊत घेणार देशमुखांची भेट
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज अनिल देशमुख यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण पाहाता या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. राजाच्या सत्तासंघर्षाचा निकाल कोणत्याही क्षणी लागू शकतो मात्र या निकालाच्या तोंडावरच राष्ट्रवादीत भूंकप होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

शिवसेनेची प्रतिक्रिया
या सगळ्या चर्चा सुरू असतानाच शिवसेनेनं सूचक प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार अस्वस्थ असल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. अजित पवार कधीही कोणताही निर्णय घेऊ शकतात असंही दादा भुसे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही अजित पवार अस्वस्थ असल्याचा इन्कार केलेला नाही. फक्त अजित पवार निर्णय कधी घेतील याच्या प्रतिक्षेत असल्याचे संकेत एकनाथ शिंदेंनी दिलेत. या सर्व पार्श्वभूमीवर राऊत आणि देशमुख यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *