महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । खारघरमध्ये उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, वाढत्या तापमानामुळे पालकवर्ग चिंतेत होता. त्यापार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत होती. त्यातच आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांना आजपासून ( २१ एप्रिल ) सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
याबाबत माहिती देताना दीपक केसरकर यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता गृहीत धरून शुक्रवारपासून ( २१ एप्रिल ) मुलांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. ज्या शाळांचा अभ्यासक्रम अद्याप सुरू आहे, त्या वगळता बोर्डाच्या सर्व शाळांना सुट्टी असेल. १५ जूनला उर्वरित महाराष्ट्र आणि विदर्भातील शाळा ३० जूनला सुरू होतील.”
सध्या असलेली उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना दि. २१ एप्रिल पासून सुट्टी देण्यात येत आहे. सुटीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळच्या अथवा संध्याकाळच्या सत्रात घ्यावेत- शालेय शिक्षण मंत्री @dvkesarkar pic.twitter.com/Tsd1i9DseM
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 20, 2023
“सुट्टीच्या काळात शाळांमार्फत अतिरिक्त वर्ग किंवा उपक्रम राबण्यात येतात. ते सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सत्रात राबवण्यात यावे. दुपारच्या सत्रात ते घेता येणार नाही. नववी आणि दहावीचे विद्यार्थी वगळता कोणत्याही वर्गाच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलवता येऊ नये. कारण, उष्णतेच्या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच, मुलांवर सुट्टीच्या काळात अभ्यासाचा बोजा देऊ नये,” अशा सूचनाही दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत.
“राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांत आठवीच्या यंदाच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही,” असं प्रतिपादन दीपक केसरकर यांनी केलं.