नवनाथांपैकी राज्यातील 8 नाथ तीर्थक्षेत्रांच्या कायापालटासाठी 2.75 कोटींचा निधी वितरित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ एप्रिल । राज्यातील नवनाथांपैकी आठ नाथ तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार आहे. तेथील पायाभूत सोयी सुविधा, तीर्थक्षेत्र अन् पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली. त्यापैकी २ कोटी ७५ लाख रुपये पर्यटन व सांस्कृतिक विभागाने वितरित केले आहेत. गोरक्षनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ क्षेत्रांना प्रत्येकी ५० लाख, तर मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ, नागनाथ, जालिंदरनाथ, भर्तरीनाथ क्षेत्रांना प्रत्येकी २५ लाख रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे ज्योतिर्लिंग, अष्टविनायक यात्रा, बौद्ध सर्किट या यात्रांप्रमाणे आता नवनाथांची यात्रा हे पर्यटनाचे नवीन दालन खुले होणार आहे. याचा सर्वाधिक लाभ बीड जिल्ह्याला होणार आहे.

प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत पायाभूत सोयी सुविधा, तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार आहे. यात राज्यातील नवनाथांपैकी आठ नाथ तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र गोरक्षनाथ देवस्थान (मांजरसुंबा) येथे सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी अंदाजित १ कोटी रुपयांना मान्यता दिली असून, यातील ५० लाख वितरित केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी (कानिफनाथ गड) येथे सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी अंदाजित १ कोटी रुपये, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटेगावातील चमस नारायण रेवनाथ क्षेत्र येथ मूलभूत सोयी-सुविधांसाठी सुमारे १ कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. त्यापैकी निम्मी रक्कम वितरित करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील श्री क्षेत्र गोरक्षनाथ कवीनारायण मच्छिंद्रनाथ येथील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी अंदाजित ५० लाख रुपयांची मान्यता दिली आहे. त्याचबरोबर पटोदा तालुक्यातील चिंचोली गावातील श्री क्षेत्र करभंजन नारायण गहिनीनाथ येथील तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी अंदाजित ५० लाख रुपये, लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात असणारे श्री श्रेत्र अविहोनारायण वडसिद्ध नागनाथ या तीर्थक्षेत्रासाठी ५० लाख रुपये, बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील येवालवाडी येथील श्री क्षेत्र अंतरीक्षनारायण जालिंदरनाथ क्षेत्रासाठी ५० लाख रुपयांची, परभणी जिल्ह्यातील गांगाखेड तालुक्यातील हरन्गुल येथील श्री दुल्मीनारायण भर्तरीनाथ तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी अंदाजित ५० लाख रुपयांना मान्यता दिली आहे. वरील सर्व क्षेत्रांसाठी मंजूर केलेल्या निधीच्या निम्मी रक्कम वितरित करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात पर्यटनाला चालना
नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. या संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली. पुढे गोरक्षनाथ उर्फ गोरखनाथ यांनी त्याचा विकास केला. त्र्यंबकेश्‍वर हे नाथसंप्रदायाचे पहिले मानले जाते. याच ठिकाणी गुरू गोरक्षनाथांनी नऊ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केल्याची बोलले जाते. यातील नऊ नाथांपैकी तीन नाथांची तीर्थक्षेत्रे बीड जिल्ह्यात आहेत. या तिन्ही तीर्थक्षेत्र विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बीडच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *