टाटांच्या गाड्यांना आता मराठी माणसाने बनवलेला लागणार पार्ट, तब्बल 13 कोटींना घेतलं पेटंट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मे । वैज्ञानिकांच्या परिश्रमामुळे आपलं रोजचं आयुष्य हे अधिक सोपं आणि सुरक्षित झालं आहे. मनुष्याचा आजवरचा इतिहास हा याची साक्ष आहे. आजही अनेक विषयांमध्ये जगभरातील संशोधक अहोरात्र काम करत आहेत. संशोधनाचा ध्यास असेल तर अन्य सर्व अडचणींवर मात करता येते. ग्रामीण भागातील, लहान शहरांमध्ये राहूनही मोठं काम करता येतं, हे अनेकदा सिद्ध झालंय. सोलापूरच्या राहुल बुऱ्हाणपूरकर यांनीही चार चाकी गाड्यांबाबत एक महत्त्वाचं संशोधन केलंय.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राहुल यांचे वडील एका साडी सेंटरमध्ये काम करतात. तर आई या गृहिणी आहेत. त्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये पुण्यातील एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरींगमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. या शिक्षणानंतर त्यांनी गॅरेजमध्ये काम करण्यास सुरूवात केली.

2010 साली खासगी गॅरेजमध्ये काम करताना त्यांना चारचाकी गाड्यांमधील प्रदुषण कमी करण्याबाबतची एक कल्पना सुचली. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी 2 वर्ष संशोधन केलं. या संशोधनातून या चारचाकी गाड्यांमधील प्रदुषणाची तीव्रता कमी करण्यासाठी त्यांनी एक पार्ट बनवला. राहुल केवळ हा पार्ट बनवून थांबले नाहीत, तर या संशोधनासाठी पेटंट मिळावं म्हणूनही त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला.

राहुल यांना 10 वर्षांपेक्षा जास्त मेहनतीचं अखेर फळ मिळालं. त्यांनी या कामाचं पेटंट मिळवलं. या कामाचं महत्त्व ओळखून टाटा मोटार्स या जगातील दिग्गज कंपनीनं तब्बल 13 कोटी 52 लाख रुपयांना हे पेटंट विकत घेण्याचं ठरवलं असल्याची माहिती राहुल यांनी दिली आहे.

काय होणार फायदा?

राहुल यांच्या संशोधनामुळे चारचाकी गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणात तब्बल 30 टक्के घट होणार आहे. त्याचबरोबर गाडीचे मायलेज देखील सुधारणार आहे. गाडीमधील सायलेन्सरजवळ हा पार्ट बसवला जातो. सध्याच्या वाहनांमध्ये ई. जी. आर. सिस्टमचा वापर केला जातो. त्याच ई.जी. आर. म्हणजेच (Exhaust Gases Recycle) चं काम प्रभावीपणे होण्यासाठी हा पार्ट उपयोगी पडतो. पी.सी.एम. या सेन्सरद्वारे हा पार्ट नियंत्रित केला जातो. त्यामुळे सायलेन्सद्वारे बाहेर फेकली जाणारी 30 टक्के दुषित हवा या पार्टद्वारे पुन्हा रिसायकल होवून इंजिनमध्ये सोडली जाते. त्यामुळे प्रदुषणात सरासरी 30 टक्के एवढी घट तर होते. त्याचबरोबर नायट्रोजन ऑक्साईड 70 टक्के कमी करण्यात याची मदत होते. साधारणतः पुढील वर्षापासून म्हणजेच 2024-25 नंतर टाटा मोटर्सकडे या पार्टचा वाहनांमध्ये वापर सुरु होणार आहे, अशी माहिती राहुल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *