Teachers Recruitment : राज्यातील अडीच लाख उमेदवारांना प्रतीक्षा असलेली शिक्षक भरती जुलै-ऑगस्टमध्ये होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मे । यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात शिक्षक भरतीसाठीची अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट परीक्षा) झाल्यानंतर 24 मार्च रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जवळपास अडीच लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. मात्र परीक्षा झाल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक भरती (Teachers Recruitment) नेमकी कधी होणार? याची प्रतीक्षा या उमेदवारांना होती. त्यामुळे आता ही शिक्षक भरती 15 मे नंतर संच मान्यता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून (Education Department) समोर आली आहे. त्यासाठी लवकरच शिक्षक भरतीसाठी असलेले पवित्र पोर्टल हे अॅक्टिव्ह होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्याने ही संच मान्यता रखडली होती. मात्र, आता शिक्षण विभागाने अंतिम करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानंतर राज्यातील शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्यक्षात शिक्षक भरतीसाठी जाहिरात काढली जाण्याची शक्यता आहे.

सरकारला भरतीचे वेगवान नियोजन करावं लागणार
दोन महिने उलटूनही शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर कुठल्याही हालचाली होत नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. याच दरम्यान उमेदवारांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे शासनाला आता पद भरतीचे वेगवान नियोजन करावे लागणार आहे. या नियोजनाबाबत शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे शिक्षक पद भरतीच्या कार्यवाहीबाबत पत्र पाठवले आहे. 15 मे पर्यंत विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम पूर्ण करुन 2023-24 वर्षाची संच मान्यता करण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातील शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांचं चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

शिक्षक भरतीचे टप्पे नेमके कसे असणार?
* विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर संच मान्यता 15 मे रोजी अंतिम केली जाणार आहे

* शिक्षण विभागाकडून संच मान्यतेचे शाळा निहायवितरण 20 मे पर्यंत होणार

* या संच मान्यतेतील मंजूर पदांनुसार पद भरतीची कार्यवाही सुरु होईल

* संबंधित शाळा व्यवस्थापनांना शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर 15 जुलै पर्यंत रिक्त पदे नोंदवून पोर्टलवर जाहिरात दिली जाईल

* 20 ऑगस्टपर्यंत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे आधी प्रक्रिया पूर्ण करायची आहे

शिक्षण संचालनालयाकडून 17 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार टेट परीक्षेच्या निकालानंतरची पदभरतीची कार्यवाही सुरु करणे आवश्यक असल्याचं प्रधान सचिवांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *