महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुन । पुणे : आषाढी एकादशीसाठी देहू आणि आळंदी येथून येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी ठिकठिकाणी स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदे कडून स्वच्छता अभियान राबविले जाते. वारकऱ्यांच्या सुखसोयींसाठी प्रतिवर्षीप्रमाणे फिरत्या शौचालयांची निविदा प्रक्रिया राबविली जाते. यावर्षीची ही निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मागील काही वर्षांपासून काम करणारे ठेकेदार यांना यंदाच्या निविदा प्रक्रियेत बाद ठरवून ब्लॅक लिस्ट असणाऱ्या सारा प्लास्टिक कंपनीला निविदा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने पायघड्या घातलेल्या दिसून आल्या. ही कंपनी एका नगरपालिका मधून ब्लॅकलिस्ट असताना राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी काम करू शकत नाही. त्यामुळे ब्लॅकलिस्ट कंपनीला निविदा दिल्यामुळे इतर काम करणारे ठेकेदार यांनी थेट हायकोर्टाचे दरवाजे ठोठवले आहेत.
वारकऱ्यांच्या सुखसोयींसाठी प्रतिवर्षीप्रमाणे फिरत्या शौचालयांची निविदा पुणे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत असते. सदर निविदेतील सर्वच कंपन्या निविदा अटीशर्तीच्या कचाट्यात सापडल्यामुळे अगदी सोमवार पर्यंत वर्क ऑर्डर देण्यात आली नव्हती मात्र जेव्हा हे प्रकरण आज सोमवारी हायकोर्टात गेले तसे प्रशासनाने स्वतःचे रक्षण करण्यासाठी २ जून रोजीची वर्क ऑर्डर काढून ब्लॅकलिस्ट कंपनीला पडद्यामागून मदत केली आहे. अशी माहिती समोर आली. आषाढी वारी तोंडावर आली असताना निर्मल वारी मात्र हायकोर्टात जाऊन पोहोचली आहे. यामध्ये सहभागी कंपन्यांना समसमान काम वाटून अथवा मागील वर्षी काम करणाऱ्या कंपनीना काम देवून यावरती तोडगा काढणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी आर्थिक तडजोडीची भूमिका घेत ब्लॅक लिस्ट कंपनीला काम करण्याची संधी कशी दिली हा विषय चर्चेत आला आहे.२६/९/२२ ला निघालेल्या आदेशाप्रमाणे सारा प्लास्ट या कंपनीला ३वर्ष साठी काळ्या यादीत टाकले असून या वेळी त्यांना हे टेंडर मिळाले. तसेच तुळजापूर मधील अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सारा प्लास्टिक या कंपनीला मागील वर्षीच ब्लॅक लिस्ट म्हणून जाहीर केल्याची फोनवरून माहिती दिली.
ठेकेदारांच्या वादामुळे निर्मल वारी कागदी प्रक्रियेत अडकणार का? यात तोडगा काढून सर्व निविदेत सहभागी ठेकेदारांना काम वाटून देणार अथवा ब्लॅक लिस्ट कंपनीलाच काम करण्याची संधी देणार याचा उलगडा उद्या हाय कोर्टात होणाऱ्या निकालावरती अवलंबून राहणार आहे. तर दुसरीकडे निर्मल वारीच्या गोंधळामुळे देहू ग्रामस्थांनी आपल्या घरातील स्वच्छता ग्रह वारकऱ्यांसाठी खुले करण्याचे सार्वजनिक आवाहन देहू नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आले आहे. वारकऱ्यांची गैरसोय होण्याऐवजी व कायदेशीर कचाट्यात संपूर्ण काळ जाण्यापेक्षा आषाढीवारी सुरळीत पार पाडावी यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.