महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुन । देशाचे टेलिकॉम मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी नागरिकांना अनोळखी फोन न उचलण्याचे आवाहन केले आहे. देशात ऑनलाईन स्कॅम आणि फसवणुकीच्या घटना वाढत असल्यामुळे त्यांनी हा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या कारवाईबाबत देखील माहिती दिली.
काय दिला सल्ला?
देशातील वाढत चाललेल्या फसवणुकीच्या घटनांबाबत विचारलं असता, अश्विनी वैष्णव यांनी लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, की सरकार याबाबत कारवाई करत आहेच मात्र लोकांनीही खबरदारी घेणं गरजेचं आहे. “मी प्रत्येक भारतीय नागरिकाला असं आवाहन करतो, की त्यांनी केवळ अशा नंबरचे फोन उचलावेत, ज्यांना ते ओळखतात. अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सना उचलणे टाळावे.” असं वैष्णव म्हणाले.
सरकारची कारवाई
दरम्यान, केंद्र सरकारने आतापर्यंत अशा फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी बरीच पावलं उचलली आहेत. यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘संचार साथी’ पोर्टलची सुरूवात. वैष्णव म्हणाले, की सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये 40 लाखांहून अधिक फेक नावांनी घेतली गेलेली सिमकार्ड ब्लॉक केली आहेत. यासोबतच अशी सिम कार्ड विकणाऱ्या 41 हजार अनधिकृत एजंट्सना ब्लॉकलिस्ट केलं आहे.
स्कॅमच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान, स्कॅमर्स नवनवीन पद्धतींनी लोकांची फसवणूक करण्याचा आणि डेटा चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करून, तर कधी फेसबुकवर मेसेज करून लोकांची फसवणूक केली जात आहे. यासोबतच, आणखी एक नवीन प्रकार आता समोर आला आहे. चक्क ‘दिल्ली पोलीस’ बोलतोय म्हणून एका महिलेचा डेटा चोरी करण्यात आला होता.