निगडी : पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाला आहे. पहाटे पाऊणे तिनच्या सुमारास हा अपघात घडला. निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या निवासस्थानाजवळील मधुकर पवळे ब्रिजवर मारूती मंदिरासमोरील रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. त्यामुळे सचिन काळभोर सर्वात आधी घटनास्थळी दाखल झाले. व सदर घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस ताबडतोब हजर झाले. व मदतकार्य सुरू झाले. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून एलपीजी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात आला. दरम्यान, बचाव कार्य एक तासासाठी थांबवण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिली.
यावेळी अग्निशामक दलाचे १०० कर्मचारी व अधिकारी तसेच निगडी पोलीस स्टेशन येथील ५० कर्मचारी व अधिकारी बचाव कार्यात तत्परतेने सहभागी झाले होते. बचावकार्यात सहभागी झालेल्या पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना पहाटे साडेसहा वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत चहाची, नाश्त्याची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली. काळभोर यांच्या मदतीला जावेद शेख, शकीर शेख, रायसिग दुहारे, रोहिदास शिवणेकर, अभिजित पुरी, पाठणेकर मॅडम, दादू सगरे, सुरेश फुआराम चौधरी यांनी सेवा बजावली.
भक्ती शक्ती उड्डाण पूल व मधुकर पवळे उड्डाण पूल येथील भुयारी मार्ग काम संपुर्ण झाले नाही. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे तसेच महापालिकेने या रस्त्यावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. तसचे मधुकर पवळे ब्रिजवरील इन-आऊट रस्त्यावर बीआरटी विभागाने बॅरेगेट्स लावले आहेत. त्यामुळेही वाहनधारकांची कमालीची गैरसोय होत आहे. आणि याचकारणांमुळे हा अपघात झाल्याचे निगडीवासीयांकडून बोलले जात आहे.
निगडी पोलिसांनी खबरदारी म्हणून मुंबई पुणे महामार्गावर तीन किलोमीटर वाहतूक दिवसभर बंद केली. याचा वाहतुकीवर परिणाम झाला. निगडी बसस्टॉपवरील प्रवाशांना कमालीच्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (निगडी) भक्ती-शक्ती उड्डाणपूल उतरताच एलपीजी गॅसच्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. टँकर पलटी झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली असून यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर केमिकलचा टँकर पलटी होऊन लागलेल्या आगीत पाचजणांचा जळून मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये अशी दुर्घटना होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी. पिंपरी-चिंचवड प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, ही मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांननी केली आहे.