महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुन । देशात आज ५ नवीन वंदे भारत एक्सप्रेस दाखल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं एकाच वेळी ५ नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन होणार आहे. गोवा (मडगाव) मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा देखील यात समावेश आहे.
या एक्सप्रेसमुळे मुंबई ते गोव्यातील अंतर काही तासात पार करता येणार आहे. मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे मुंबई ते गोवा या कनेक्टिव्हिटीसाठी एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. या एक्सप्रेसमुळे गोवा आणि कोकण अशा पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणी केवळ आठ तासात पोहोचता येणार आहे.
पंतप्रधान मोदी राणी कमलपती या भोपाळ जवळील रेल्वे स्टेशनवरून ५ वेगवेगळ्या शहरात असणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून स्वागत करतील.
या 5 वंदे भारत ला पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार
1. राणी कमलपती (भोपाळ)- इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस
2. भोपाळ जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस
3. रांची- पटना वंदे भारत एक्सप्रेस
4. धारवाड- बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस
5. गोवा (मडगाव) मुंबई वंदे भारत एक्सप्रेस
मध्य प्रदेशला दोन वंदे भारत एक्सप्रेस
मध्य प्रदेशात दोन वंदे भारत एक्सप्रेस येणार आहेत. यात राणी कमलापती -जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस भोपाळ आणि जबलपूर एकमेकांना जोडतील. राज्यातील अनेक पर्यटन स्थळांना यामुळे भेट देता येणार आहे. यामध्ये भेडाघाट, पंचमढी आणि सातपुडा यांचा समावेश आहे.
तर खजुराहो-भोपाळ-इंदूर वंदे भारत ट्रेन राज्यातील माळवा आणि बुंदेलखंड भागांना भोपाळशी जोडणार आहे. यादरम्यान ही ट्रेन महाकालेश्वर, मांडू, महेश्वर, खजुराहो या पर्यटनाच्या महत्त्वाच्या ठिकाणांवरून जाणार आहे.