महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुन । Tripura Accident: त्रिपुरामधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. त्रिपुरामधील उनाकोटी येथे जगन्नाथ यात्रेदरम्यान रथाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजप्रवाह रथात उतरला. या दुर्देवी घटनेत सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, त्रिपुरातील जगन्नाथ रथयात्रेत मोठी दुर्घटना घडली असून यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील कुमारघाटमधून भगवान जगन्नाथ यांची यात्रा काढण्यात येत होती. या रथयात्रेत वीजेचा मोठा प्रवाह वाहणाऱ्या तारेला रथाचा स्पर्श होऊन दुर्घटना घडली.
रथाचा वीजेच्या तारेला स्पर्श होताच प्रवाह वाहू लागल्याने करंट बसून सात जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १५ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे रथयात्रेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला असून जखमींना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ही घटना इतकी भयंकर होती की, विजेच्या प्रवाहामुळे रथात बसलेल्या व्यक्तींना आग लागली . यावेळी लोकांनी मोठा आरडा ओरडा केला, पण प्रवाहामुळे त्यांच्यासमोरच काहीजण जळून मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले. हा रथ १३३ केव्ही ओव्हरहेड केबलच्या संपर्कात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त…
या दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले की, “या भीषण अपघातात अनेक भाविकांना प्राण गमवावे लागले आणि काही जण जखमी झाले. या कठीण काळात राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे..”