महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुन । 2019 च्या निवडणुकीनंतर पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मोठा खुलासा केला आहे. अखेर त्यांनी या शपथविधीबाबत मौन सोडलं आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी गौप्यस्फोट केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत आता नव्यानं गौप्यस्फोट समोर आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा धक्कादायक खुलासा केला. पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हे गौप्यस्फोट केला. त्यावेळी सरकार स्थापनेला शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा होता. मी आणि अजित पवारांनी उगाच शपथ घेतली नव्हती. तर आमच्यावर तशा जबाबदाऱ्या सोपावण्यात आल्या होत्या असं फडणवीस यांनी सांगितलं.
शरद पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनीच केलं, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.