उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत भूमिका स्पष्ट करावी ; प्रकाश आंबडेकर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ जुलै । वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत भूमिका स्पष्ट करावी, असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीदिला आहे. लवकर निर्णय झाला नाही, तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे असल्याचं मोठं विधानही प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. ते अकोल्यात आज बोलत होते.

भारत राष्ट्र समिती (BRS) सोबत संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचं हे सूचक विधान मानलं जातं आहे. दरम्यान, आंबेडकरांनी काँग्रेससोबतच्या सध्याच्या बोलणीवर ‘थँक्यू’ म्हणत बोलणं टाळलं. राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांवर आंबेडकरांनी स्तुती केली आहे. अजित पवार ‘जे ओठात, तेच पोटात असणारा नेता’ असल्याचं म्हणत आंबेडकरांनी अजितदादांवर स्तुतीसुमनं उधळली आहे.

दरम्यान, वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. त्यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी यासंदर्भात काय बोलणं झालं आहे, हे स्पष्ट करावं. आता निवडणुकाजवळ आहे. उद्धव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आहे. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘पेरलं तेच उगवलं’ या शरद पवारांवरील आरोपांमध्ये तथ्य नाहीय. राजकारणात परिस्थितीनुरूप राजकीय तोडफोड, गठजोडीचे निर्णय घ्यावे लागतात. पवारांनी आतापर्यंत राजकारणासाठी जे केलंय ते आता त्यांच्यासंदर्भात घडलं. राजकारणातले ‘रणछोडदास’ सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे समोर आलेत. चौकशांच्या छायेखालची लोकं अजित पवारांसोबत गेलीत, असं आंबेडकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *