“शरद पवारांनी विकेट घेतली हे १०-१५ दिवसांनी….!”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्वीट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट बघायला मिळत आहेत. २ जुलै २०२३ ला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर या पक्षातला उभा दावा समोर आला आहे. ५ जुलै २०२३ ला राष्ट्रवादीच्या दोन सभा पार पडल्या. पहिली अजित पवारांची आणि दुसरी शरद पवारांची. अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्या निवृत्तीचं वयच काढलं. तर शरद पवार यांनी संयमाने उत्तर देत आपल्या सभेतून या सगळ्या बंडावर फारसं बोलणं टाळलं आहे. आता या सगळ्या घडामोडींना साधारण १५-१६ दिवस झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सूचक ट्वीट केलं आहे.

काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड?
पुरोगामी महाराष्ट्राचा एकमेव आवाज…शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा खरा प्रतिनिधी, आणि राजकारणात संयमाला किती महत्त्व आहे हे कोणाकडून शिकावं? एकच नाव शरद पवार. कोणाची विकेट कशी गेली हे विकेट गेलेल्या माणसालाही समजत नाही. १०-१५ दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली. बंडाला १५ दिवस झाल्यावर हे ट्वीट आव्हाडांनी केल्यामुळे आता कुणाची विकेट जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


अजित पवार गट आणि त्यांचे आमदार हे गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार यांना भेटत आहेत. त्याचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार गटाला अजित पवार आणि त्यांचे आमदार का भेटत आहेत? याची चर्चा होते आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले असून त्यानुसार दोन प्रतोद, दोन विधिमंडळ गटनेते आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती दोन्ही गटांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गट व शिंदे गटाप्रमाणेच सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती झाली आहे. त्यामुळे सोमवार अर्थात आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात नेमकं काय चित्र दिसणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. त्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी रविवारी दुपारी वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांची भेट घेतली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *