Rain Effect | मुंबई-पुणे रेल्वे सेवा दोन दिवसांसाठी ठप्प, या गाड्या रद्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । राज्यभरात धुवाँधार पाऊस कोसळतोय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगावसह राज्यभरात पाऊस प्रचंड पडतोय. या पावसाचा रेल्वे वाहतुकीला खूप मोठा फटका बसला आहे. कर्जत, अंबरनाथ, बदलापूर येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. याशिवाय पाऊसही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकावर पावसामुळे तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. सध्या मुंबई ते डोंबिवली अशी रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. पण डोंबिवलीच्या पुढे डाऊन मार्गाला मोठा खोळंबा झालाय.


विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. मुंबईत सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प पडली आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून पुण्याला येणाऱ्या सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
रेल्वे रुळ पाण्याखाली गेले असल्याने रेल्वे प्रशासनाने याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे उद्या गुरुवारी देखील या मार्गावरील रेल्वे सेवा बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.


‘या’ गाड्या रद्द
पुणे-मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन, सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी या रेल्वे उद्या देखील रद्द राहणार आहेत. पुण्यामार्गे जाणाऱ्या तसेच मुंबईतून येणाऱ्या सर्व रेल्वे आज आणि उद्या रद्द राहणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची सर्व विभागीय आयुक्तांशी फोनवर चर्चा
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवर संवाद साधला आणि त्यांच्याकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी अधिकचा पाऊस आहे, तेथे एनडीआरएफ, एसडीआरएफ चमू आवश्यकतेनुसार सज्ज ठेवाव्या आणि कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाची संपूर्ण सज्जता ठेवावी, असे निर्देश दिले.

पुढच्या काळात पाऊस अधिक पडण्याची शक्यता असलेल्या भागात नागरिकांना तातडीने आणि नियमितपणे विविध माध्यमातून अलर्ट द्यावेत. मानवी चुकीमुळे शेतीचे नुकसान होणार नाही, यादृष्टीने सुद्धा काळजी घ्यावी, असेही निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे मुसळधार पाऊस आणि त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनासाठीची सतर्कता यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *