महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने आज 26 जुलै रोजी चार जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. या रेड अलर्ट असलेल्या चार जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणेचा समावेश आहे. रेड अलर्ट असल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या या रेड अलर्टमुळे रायगड जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेशच जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्याला असलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट असल्याने प्रशासन आणि मदत यंत्रणा या अलर्ट मोडवर आहेत. तर हवामान खात्याकडून राज्यातील मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज ऑरेन्ज अलर्ट असल्याने चार जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.