महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ ऑगस्ट । भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना टीम इंडियाने २०० धावांनी जिंकला. यासह भारताने मालिका २-१ अशी जिंकली. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच विकेट गमावत ३५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ केवळ १५१ धावा करू शकला आणि २०० धावांनी सामना गमावला.
कॅरेबियनविरुद्ध सलग 13 वी वनडे मालिका जिंकली
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची सलग 13 वी एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारताने एकाच संघाविरुद्ध सलग सर्वाधिक एकदिवसीय मालिका जिंकण्याचा स्वतःचा विक्रम मोडीत काढला आहे. या बाबतीत पाकिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने झिम्बाब्वेविरुद्ध सलग 11 वनडे मालिका जिंकली आहे. भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 200 धावांनी पराभव केला. भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमधला हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी 2018 मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा 224 धावांनी पराभव केला होता.
इशान, गिलसह चौघांची तडाखेबंद अर्धशतके
शुभमन गिल (85), इशान किशन (77), हार्दिक पंड्या (नाबाद 70) व संजू सॅमसन (51) या चौघांच्या तडाखेबंद अर्धशतकांच्या बळावर भारताने विंडीजविरुद्ध तिसर्या व शेवटच्या वन-डे लढतीत निर्धारित 50 षटकांत 5 बाद 351 धावांचा डोंगर रचला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण लाभल्यानंतर शुभमन व इशान यांनी 19.4 षटकांत 143 धावांची तडाखेबंद शतकी भागीदारी साकारत भक्कम पाया रचला; तर पंड्या, सॅमसन यांनी त्यावर सोनेरी कळस चढवला.