महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी- बीड – आकाश शेळके : शिक्षणासाठी टॅबची मागणी केल्यानंतर आई-वडील पेरणीमुळे तो घेऊ न शकल्याने १७ वर्षांच्या मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ जून रोजी गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे घडली.
भोजगाव येथील राजेंद्र संत यांचा मुलगा अभिषेक पाथर्डी तालुक्यातील महानोर टाकळी येथे दहावीचे शिक्षण घेत होता. त्याने दहावीची परीक्षा दिली आहे. पुढचे शिक्षण आता ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने टॅबची आवश्यकता असल्याने अभिषेकने याने आई-वडिलांकडे टॅबची मागणी केली. त्यांनी अभिषेकला सध्या बी-बियाणे आणि पेरणीचे दिवस असून थोडे दिवस थांंब, आपण घेऊ, असे सांगितले. परंतु हट्टामुळे अभिषेकला घेऊन ते गेवराईला एका मोबाइल शॉपवर गेले, परंतु टॅब मिळू शकला नाही. त्यामुळे नंतर घेऊ, असे सांगून ते घरी परतले. कुटुंबातील सर्वजण शेतात जाताच १८ जून रोजी दुपारी अभिषेक याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आईवडील घरी परतल्यानंतर त्यांना हा प्रकार कळला. पोलिसांनी अभिषेकचा मृतदेह ताब्यात घेऊन तो गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयास पाठवला. दरम्यान, सायंकाळी ६ वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर अभिषेकचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.