कडाक्याच्या थंडीत ७२ तासात लष्कराच्या इंजिनिअर्सनी गलवान नदीवर उभा केला पूल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – : दि.२१ – गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी तिथे अत्यंत तणावाची स्थिती होती. मात्र त्या परिस्थितीतही भारतीय लष्कराने रणनितीक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या पुलाचे बांधकाम पूर्ण केले. भारतीय लष्कराच्या इंजिनिअर्सना गलवान नदीवर अत्यंत वेगाने पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते.

६० मीटर लांबीच्या या पुलामुळे भारतीय लष्कराच्या तुकडयांना अत्यंत वेगाने नियंत्रण रेषेजवळ पोहोचता येईल. गुरुवारी दुपारी हा पूल बांधून पूर्ण झाला. लष्कराच्या इंजिनिअर्सनी दोन तास या पुलावर वाहनांची चाचणी घेतली. या पुलामुळे भारतीय लष्कराला नियंत्रण रेषेजवळ वेगाने हालचाल करता येणार, हे चीनला ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी या पूल बांधणीला प्रचंड विरोध केला होता. पण भारताने चीनच्या दादागिरीला कुठेही किंमत न देता अत्यंत वेगाने हा पूल बांधून पूर्ण केला. हा पूल एक प्रकारे चीनच्या दादागिरीला उत्तर आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

सोमवारी रात्री या पुलापासून काही अंतरावरच मोठा रक्तरंजित संघर्ष झाला होता. लष्कराच्या कारु स्थित माऊंटन डिव्हिजनने लष्कराच्या इंजिनिअर्सच्या युनिटला अजिबात विलंब न लावता लवकरात लवकर या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. रणनितीक दृष्टीने हा पूल महत्वाचा असल्याने सैन्य तुकडयांना बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी इंजिनिअर्सना सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. मंगळवारी आणि बुधवारी रात्री अत्यंत कडाक्याच्या थंडीतही या पुलाचे बांधकाम सुरु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *