महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑगस्ट । गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागातर्फे ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमण कधी होणार याकडे लक्ष ठेवून आहेत.
जून महिन्याच्या शेवटी पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण वाढलं होते. त्यामुळे दिलासा मिळाला होता. भारतीय हवामान विभागाकडून १८ ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
13 Aug, IMD मॉडेल मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्रात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता, विदर्भातील काही भागात आणि शेजारील, आणि शेवटच्या आठवड्यात कोकण विभागातील काही भागात शक्यता दिसते.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे, पण स्पष्ट नाही. pic.twitter.com/JkPsOdpck4— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 13, 2023
के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १८ ऑगस्टपासून पावसाची शक्यता आहे. राज्यात १८ ते २४ ऑगस्ट आणि २५ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस होईल, असं अपेक्षित असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी विदर्भात अतिवृष्टी झाल्याचे पाहयला मिळाले होते. अनेक गावे पाण्याखाली गेल्यानंतर आता मागील सात दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. याचा फटका सोयाबीन पिकाला बसण्याची शक्यता आहे. सध्या पिकाला पावसाची गरज असून फुलोऱ्यात आलेलं सोयाबीन पिक पावसावाचून वाया जाण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट देखील ओढावण्याची शक्यता आहे.