महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । वरुणराजाची महाराष्ट्रावर वक्रदृष्टी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात तर सर्वत्र पावसाने ओढ दिली. त्यामुळे राज्यातील ३५८ पैकी २६४ तालुक्यांत दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्याची दखल घेत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (२२ ऑगस्ट) बैठक घेऊन सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनांना आताच सुरुवात करावी. धरणातील पाणीसाठा पाहून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून काटकसरीने पाणी वापराचे नियोजन करावे. ग्रामीण भागातही विहिरी, तलावातील उपलब्धता पाहून पाण्याचे नियोजन करावे. जनावरांच्या चाऱ्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी घ्यावा, वन विभागाने गवताचा लिलाव न करता त्याच्या पेंढ्या तयार करून ठेवाव्यात, असे आदेश शिंदे, पवार यांनी दिले.
खरीप हंगामात आतापर्यंत १३८.४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलडाणा या पाच जिल्ह्यांत सोयाबीन व कापसाची अधिकाधिक पेरणी राज्यात सध्या ३५० गावे, १३१९ वाड्यांमध्ये ३६९ टँकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा. मराठवाड्यातील अनेक भागांत ऑगस्ट महिन्यात पाऊसच न झाल्याने पिके कोमेजली आहेत.
नाशिक | सध्या राज्यातील अनेक भागात पावसाला पोषक वातावरण असले तरी प्रत्यक्षात पाऊस पडत नाही. मात्र आता २३ व २४ ऑगस्ट रोजी विदर्भात येलो अलर्टचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकणासह घाटमाथ्यावर मध्यम तरमराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. खरे तर १९ ऑगस्टनंतर पावसाचे पुनरागमन होईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र तो खरा ठरला नाही. आता पावसाळी हंगामाचे आता केवळ ३८ दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
मंगळवारचा पाऊस : माथेरान १७, जळगाव २, अलिबाग २, पुणे १, नाशिक २, कुलाबा ३, महाबळेश्वर १०, ठाणे २, सांताक्रुज ३ मिलीमीटर.
३५८ पैकी फक्त ९४ तालुक्यांत १००% पाऊस
२५ ते ५०% पाऊस : १५ तालुके ५० ते ७५% पाऊस : १०८ तालुके ७५ ते १००% पाऊस : १३८ तालुके