महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या प्रवेश प्रक्रियेसाठी नव्याने मुहूर्त लागला असून पालकांना आजपासून आरटीईसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरलेल्या पालकांनाही नव्याने आपल्या पाल्यांचा अर्ज भरावा लागणार आहे.
आरटीई (RTE) प्रवेशाच्या पोर्टलवर आरटीई प्रवेशास पात्र असणाऱ्या शाळा व प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांची जिल्हा निहाय माहिती दिली आहे. शासनाने आरटीई प्रवेशासाठी राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ च्या नवीन आदेश काढले. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने (Education department) यंदा महत्त्वपूर्ण बदल केला. या बदलानुसार खासगी शाळेत प्रवेशाला विद्यार्थी मुकणार होते. विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरात अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असल्यास त्याच शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. खासगी शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही. या बदलास पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
शासनाच्या बदलास स्थगिती
शासनाच्या नवीन नियमांमुळे सर्वसामान्य मुलांनी इंग्रजी माध्यमांच्या खासगी (School) शाळेची वाट बिकट झाली होती. तर श्रीमंत मुलांसाठी इंग्रजी माध्यमांची खासगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी यामुळे झाली असती. मात्र उच्च न्यायालयाने शासनाचा हा निर्णय रद्द करत शासनाने केलेल्या या बदलास न्यायालयाने स्थगिती दिली.
सर्वांना नव्याने भरावे लागणार अर्ज
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत एक लाखांवर जागा उपलब्ध आहेत. आता आरटीई २५ टक्के राखीव जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. ज्या पालकांनी त्यांच्या पाल्यांची यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यांनाही पुन्हा नोंदणी करावी लागणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली.