महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुन ।। मान्सून दाखल होताच महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सलग दोन तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, मागील दोन दिवसांपासून पावसाने काही भागात दांडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
मान्सूनला (monsoon) संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला २० जूनपर्यंत वेळ लागू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. मात्र, असं असलं तरी आजपासून पुढील ५ दिवस काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शनिवारी दक्षिण कोंकणात बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rain Alert) होईल. उत्तर कोंकणातही पावसाच्या जोरदार सरी बरसतील. दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो.
त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी जमिनीत ६ इंच खोल ओल जाईपर्यंत पेरणीची घाई करू नये, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस?
आयएमडीच्या अंदाजानुसार, आज रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल. तसेच पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसतील. याशिवाय धुळे, नंदुबार, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.