![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जुन ।। पावसाची चाहूल लागताच सणांना सुरुवात होते आणि सण म्हटले की, महिलांचे उपवास आले. जून महिन्यांचा पहिला सण म्हणजेच ‘वटपौर्णिमा’ ही २१ जून रोजी शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे. या सणाच्या तयारीमध्ये महिलावर्ग सध्या व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. वटपौर्णिमला महिला नवऱ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वडाची पूजा करून उपवास करतात. आता उपवास म्हटला की, उपवासाचे पदार्थ आलेच. अनेक स्त्रियांना उपवासादरम्यान अॅसिडीटीचा त्रास होतो. त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. अॅसिडीटीमुळे डोकेदुखी, मळमळ, छातीत जळजळणे अशा समस्या देखील सुरु होतात. त्यामुळे उपवास करताना आहाराबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उपवासाला वेळच्या वेळी खाणे महत्त्वाचे आहे. ज्या महिलांना उपवासाचा जास्त त्रास होत असल्यास निर्जल उपवास टाळावा. तसेच उपवासाच्या दिवशी कामातून थोडी विश्रांती घेणेही गरजेचे असेते.

फळे
वटपौर्णिमा हा सण पावसात येत असल्यामुळे जास्त पिकलेली फळे खाऊ नये. त्यामुळे उपवासाला अॅसिडीटीचा त्रास होण्याची शक्यता वाढते. तसेच दीर्घकाळ कापून ठेवलेली फळेही उपवासाला खाऊ नये. केळे आणि बदामचा ज्यूस उपवासाला प्यायल्यास अॅसिडीटी होत नाही. तसेच अॅसिडीटीचा त्रास थांबवण्यासाठी तुळशीची पाने देखील तुम्ही खावू शकता.
शरीर हायड्रेट
उपवासाला आपल्याला थोडा अशक्तपणा वाटतो. अशावेळी महिलावर्ग मोठ्या प्रमाणात कॉफी आणि चहाचे सेवन करतात जे आरोग्यासाठी घातक असते. चहा-कॉफीच्या अतिसेवनामुळे अॅसिडीटीचा त्रास होतो. त्यामुळे उपवासाच्या वेळी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीरात ऊर्जा कायम राहण्यासाठी तुमच्या आहारात नारळ पाणी, दूध ,ताक, फळांचे रस इत्यादींचा समावेश करावा. तसेच शरीरामध्ये ताकद टिकून रहावी यासाठी सुकामेवा, खजूर आणि राजगिऱ्याचे लाडू किंवा चिक्की देखील तुम्ही खाऊ शकता. पोटाला थंडावा देणारे पदार्थ उपवासाला खावे.
साबुदाणा पदार्थ
उपवास म्हटला की, साबुदाणा येतोच. नेहमीच आपण उपवासाला साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा खात असतो. पण हाच साबुदाणा जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यास नुकसान होते. साबुदाणामुळे शरीराला पोषण मिळत नाही तसेच अॅसिडीटीही होते. उपवासाला साबुदाणा वगळता इतर खाद्यपदार्थ खाण्याचा प्रयत्न करावा. तसेच उपवासाला साबुदाणा खायचा असल्यास त्यासोबत काकडी आणि दही खावे. यामुळे पोटाला आराम आणि शरीरील पोषण मिळते. उपवासाला जास्त तेलकट पदार्थ खावू नये.