महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. ऑक्टोंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, दरम्यान, काल शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला यांच्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. दरम्यान, अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत, खासदार शरद पवार यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे.![](https://maharashtra24.com/wp-content/uploads/2024/06/veer1-19-1024x793.jpg)
खासदार शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर आणि आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर भाष्य केले.
अर्थसंकल्पावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘साधी गोष्ट आहे मी एखाद्या गोष्टीला १०० रुपये खर्च करणार म्हणालो आणि माझ्या खिशात ७० रुपये आहेत, तर मग मी १०० रुपये खर्च कसे करणार?, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला. ‘पहिला प्रश्न हा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे? दसरं महसुली खर्च किती होणार आहे? आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार? याची तरतुद न करता खर्च करणार म्हटलं आणि विचारपूर्वक केलं असं म्हटलं तरी फारसा काही अर्थ लागत नाही, असंही शरद पवार म्हणाले.
पीएम मोदींवर टीका
“लोकसभेला महाराष्ट्रात आम्हाला ४८ पैकी ३१ जागा मिळाल्या, ४८ पैकी ३१ जागा मिळतात याचा अर्थ लोकांचा ट्रेंड समजत आहे. या धसक्यामुळेच आता हे असं बजेट मांडले आहे, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडा आहे”, अशी टीकाही शरद पवार यांनी केली. ‘लोकांची मानसिकता स्पष्ट झाली आहे, लोक मोदींच्या कारभारावर खूष नाहीत. मोदी गॅरंटी सांगत होते पण, गॅरंटी चाललेली दिसत नाही. आता मोदींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, असा टोलाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.