Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा ‘तो’ निर्णय ठरणार गेमचेंजर ; विधानसभेपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीला ‘पॉवर’!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जुलै ।। येत्या काही महिन्यांमध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला नागरिकांकडून देणग्या स्वीकारण्याची परवाणगी दिली आहे.

दि. 8 जुलैला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवडूक आयोगाची दिल्लीतील निर्वचन सदन येथे भेट घेतली होती. त्यांतर आयोगाने हा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मोठा फायदा होणार हे निश्चित आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे नागरिकांकडून पक्षासाठी देणग्या स्वीकारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. यानंतर आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या संबंधित कलमांतर्गत सरकारी कंपन्यांशिवाय इतर कोणतीही व्यक्ती किंवा कंपनीकडून स्वेच्छेने दिलेल्या देणग्या स्वीकारण्याची परवानगी आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

जुलै 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षातील सुमारे 40 आमदारांनी महायुती सरकरमध्ये सहभागी होत, राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता. त्यानंंतर झालेल्या न्यायालयीन लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले होते. तर शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले होते.

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष आणि चिन्ह जाऊनही शरद पवार यांनी पक्षात कोणताही मोठा नेता नसताना 10 जागा लढवत 8 जागांवर विजय मिळवला. तर दुसरीकडे महायुतीतून लढणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली. महायुतीतून लढणाऱ्या अजित पवार यांच्या वाट्याला जागावाटपात अवघ्या चारच जागा आल्या होत्या.

दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांचा धुव्वा उडवत 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवला.

महाविकास आघाडीत लोकसभेत मिळालेल्या यशामुळे मोठा उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे विविध नेते राज्यातील विविध भगांत फिरत विधानसभेसाठी आखणी करत आहेत. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *