…तर थेट तुमच्या गावातून पंढरपूरला जाणार बस; जाणून घ्या ती एकमेव अट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.११ जुलै ।। आषाढी वारीसाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येत आहे. सर्वसामान्यांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यानंतर आता एसटी महामंडळानेही जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. आषाढीसाठी पाच हजार गाड्या सोडण्यात येणार आहेत. शनिवारपासून या बसेससच्या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एकूण पाच हजार बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यात ४० पेक्षा जास्त प्रवाशांनी बुकिंग केल्यानंतर थेट त्या गावांतून बसगाडी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. आत्तापर्यंत एक हजार 30 गाड्यांचे बुकिंग झाले असून त्या बस आता वारकऱ्यांच्या गावांतून थेट पंढरपुरात येणार आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यभरातून भाविक पंढरीत येतात. या भाविकांना सूकर प्रवास करता यावा, यासाठी एसटी माहामंडळाने प्रय़त्न केले आहेत.

 

17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. एकादशीसाठी संतांच्या मानाच्या पालख्या पंढरीसाठी रवाना झाल्या आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. याच पार्श्वभूमीवर भाविकांसाठी लाल परी धावून आली आहे. प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. भाविक प्रवाशांची संख्या ४० पेक्षा जास्त असल्यास त्यांना त्या गावांतून बसगाडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे असेल एसटीचे नियोजन
– १,०३० गावातून बुकिंग झालेल्या बस
– १३ जुलैपासून एसटी गाड्या
– ३९७० आगारातून धावणाऱ्या गाड्या सुटणार
– १२ ते १५ लाख वारकरी येण्याचा अंदाज

एसटीच्या या प्रवासात ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

विठुरायाच्या दर्शनासाठी 12 ते 15 लाख भाविक दर्शनाला येतील, असा अंदाज आहे. त्यापार्श्वभूमीवर 12 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. मागील वर्षी एसटीने ४,२४५ विशेष बस सोडल्या होत्या. यंदा पाच हजार गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *