IPL 2025 : ‘या’ खेळाडूंवर आयपीएलमध्ये दोन वर्षांची बंदी? सर्वच संघ चिंतेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट ।। IPL 2025 Franchises Want 2 Year Ban On Foreign Players : आयपीएल २०२५ च्या पार्श्वभूमीवर फ्रँचायझींचे संघमालक आणि बीसीसीआय यांच्यात झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा पाहायला मिळाली. या बैठकीत संघमालकांनी परदेशी खेळाडूंबाबत बीसीसीआयच्या आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलकडे एक मोठी मागणी केली आहे. लिलावात विकत घेतल्यावर कोणत्याही ठोस कारणाशिवाय हंगामासाठी अनुपलब्ध होणाऱ्या परदेशी खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी घालावी, कारण अशा खेळाडूंमुळे फ्रँचायझींचे मोठे नुकसान होते.

परदेशी खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी घालावी –
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व १० फ्रँचायझींनी दोन्ही मुद्यांवर आपली संमती दिली आहे. त्याबरोबर आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने मोठ्या लिलावासाठी परदेशी खेळाडूंना नोंदणी करणे बंधनकारक करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. जेणेकरून या खेळाडूंना त्यांच्या सोयीनुसार मोठी रक्कम मिळण्याच्या आशेने छोट्या लिलावात सहभागी होता येणार नाही. त्याचबरोबर हंगाम सुरू होण्यापूर्वी वैयक्तिक कारणांमुळे परदेशी खेळाडूंना अनुपलब्ध केल्याने आयपीएल फ्रँचायझी खूश नाहीत. फ्रँचायझींनी सांगितले की याचा त्यांच्या कामगिरीवरही परिणाम होतो. कारण संघाची रणनीती त्या परदेशी खेळाडूंना लक्षात घेऊन बनवली जाते.

लिलावाच्या वेळी खेळाडूंच्या अनुपलब्धतेबद्दल माहिती मिळावी –
आयपीएल फ्रँचायझींनी सांगितले की, जर बोर्डाने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सांगितले किंवा ते जखमी झाले किंवा काही कौटुंबिक कामामुळे ते संघात सहभागी होऊ शकले नाहीत, तर अशा परिस्थितीत ते खेळाडूंना परवानगी देतील. पण लिलावाच्या वेळी खेळाडूंच्या अनुपलब्धतेबद्दल त्यांना माहिती असल्यास बरे होईल. फ्रँचायझींना ही समस्या भेडसावत आहे की अनेक वेळा मूळ किमतीत खरेदी केलेले खेळाडू लिलावानंतर त्यांची नावे माघारी घेतात. त्यांनी एका खेळाडूचे उदाहरणही दिले, ज्यामध्ये खेळाडूच्या मॅनेजरने अशी अट ठेवली होती की अधिक पैसे दिल्यास, तो खेळाडू त्या फ्रेंचायझीसाठी खेळण्यास तयार असेल.

फ्रँचायझींनी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलला असेही सांगितले की गेल्या दोन लिलावाच्या (२०१८-२४) दरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत. जेव्हा काही परदेशी खेळाडूं छोट्या लिलावात जास्त पैसा मिळवण्यासाठी मोठ्या लिलावात उपलब्ध राहिले नव्हते. यानंतर त्यांनी छोट्या लिलावांमध्ये मोठी रक्कम मिळवली होती. २०२२ च्या मोठ्या लिलावात इशान किशनसाठी सर्वाधिक बोली लावली गेली होती, मुंबई इंडियन्सने त्याला १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. यानंतर २०२४ साठी झालेल्या छोट्या लिलावात मिचेल स्टार्कला केकेआरने २४.७५ कोटी रुपयांना तर पॅट कमिन्सला एसआरएचने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले गेले.

यातील काही खेळाडू आणि त्यांचे मॅनेजर या प्रणालीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी काही तरतुदी करण्याची गरज असल्याचे फ्रँचायझींनी सांगितले. फ्रँचायझींनी सांगितले की, एखाद्या नवीन खेळाडूने छोट्या लिलावासाठी नोंदणी केली, तर ते समजू शकतात परंतु मोठे खेळाडू मोठ्या लिलावासाठी उपलब्ध असले पाहिजेत. जर ते विकले गेले नाहीत तर अशा परिस्थितीत ते पुढील लिलावासाठी स्वतःची नोंदणी करू शकतात. आता या विविध मागण्यांवर आयपीएल गव्हर्निंग काऊंसिल काय निर्णय घेते याची प्रतिक्षा करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *