महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येत्या काही मोठी आनंदाची बातमी येणार आहे. १८ महिन्यांचा थकीत डीए तसेच जुलैपासून मिळणाऱ्या वाढीव महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट मिळू शकते. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या AICPI निर्देशांकाच्या अर्धवार्षिक डेटाच्या आधारे डीए जुलैपासून ३ ते ४% वाढण्याची शक्यता आहे.
वाढीव महागाई भत्त्याची घोषणा कधी होणार
आजपासून दहा दिवसांनंतर म्हणजेच सप्टेंबर महिन्यात सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदवार्ता देण्याची शक्यता आहे. केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने पुढील महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ करणे अपेक्षित आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३% होईल. पण करोना काळात कर्मचाऱ्यांची रोखलेली डीए थकबाकी सोडण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.
केंद्र सरकार आपले कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता तसेच महागाई सवलतीत वर्षातून दोनदा – जानेवारी आणि जुलै – सुधार करते. अशा परिस्थितीत केंद्रात नवीन सरकार आल्यापासून डीए वाढीबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही, ज्याची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे सणासुदीपूर्वी सरकार सप्टेंबर महिन्यात चांगली बातमी देणे अपेक्षित असून सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता मिळू शकतो जो जुलैपासून लागू होईल.
डीए किती वाढणार?
यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये सरकारने महागाई भत्त्यात ४% वाढ केली होती ज्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ५०% झाला. अशा स्थितीत जुलै महिन्यासाठी ३ किंवा ४ टक्के वाढ अपेक्षित आहे. असे झाल्यास आता एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार ५० हजार रुपये असेल, तर महागाई भत्ता २ हजार रुपयांनी वाढेल. जुलैमध्ये डीए आणि पगार वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांचे आणखी अनेक भत्ते वाढतील ज्यामुळे त्यांना महागाईपासून मोठा दिलासा मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १८ किंवा २५ सप्टेंबर रोजी महागाई भत्त्यात ३% वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते मात्र, सरकारकडून अद्याप कोणताही अजेंडा देण्यात आलेला नाही.
थकीत DA देण्यावर सरकारची भूमिका
अलीकडेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सदस्यांनी महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत सरकारच्या निर्णयावर प्रश्न विचारले होते. ‘कोविड काळात रोखून ठेवलेला १८ महिन्यांचा महागाई भत्ता/केंद्रीय कर्मचारी/पेन्शनधारकांना दिलासा देण्याचा सरकार सक्रियपणे विचार करत आहे का?’, या प्रश्नाला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.