AUS vs IND Test: कॅप्टन कमिन्सचा ऑस्ट्रेलिया टीमला सल्ला ; बुमराला शांत ठेवा अन्‌ भारताविरुद्ध मालिका जिंका !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑक्टोबर ।। भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २२ नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या अत्यंत बहुप्रतीक्षित मालिकेचा बिगुल वाजला असून याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने माईंड गेम खेळण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याने आपल्या सहकाऱ्यांना सल्ला देताना म्हटले की, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला गोलंदाजीत यश मिळवून देऊ नका. त्याला शांत ठेवा. त्यानंतरच ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिका जिंकता येईल.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने याआधी सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. टीम इंडियाचा संघ यंदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका विजयाची हॅट्‌ट्रिक साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

एका क्रीडा वाहिनीशी संवाद साधताना पॅट कमिन्स या वेळी म्हणाला, मी जसप्रीत बुमराचा मोठा चाहता आहे. तो अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. आम्ही त्याला शांत ठेवू याची आशा आहे. यामुळे आम्हाला मालिकाही जिंकता येऊ शकेल. भारतीय संघामध्ये बुमरासोबत इतरही गोलंदाज आहेत, जे ऑस्ट्रेलियामध्ये अद्याप खेळलेले नाहीत. आम्ही अजून त्यांना पाहिलेले नाही.

आयसीसी स्पर्धांमधील यशाचा फायदा
पॅट कमिन्सने याप्रसंगी आयसीसी स्पर्धांमध्ये भारताविरुद्ध मिळवलेल्या यशाचा आम्हाला फायदा होईल, असे म्हटले.

तो म्हणाला, भारताने आम्हाला आमच्याच देशामध्ये दोन कसोटी मालिकांमध्ये पराभूत केले, मात्र त्या मालिकांना बराच अवधी झाला आहे. आम्ही भारतावर जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय साकारला, तसेच एकदिवसीय विश्‍वकरंडकाच्या अंतिम सामन्यात त्यांच्यावर मात केली. आमच्यासाठी हे क्षण संस्मरणीय आहेत.

पुजाराची अनुपस्थिती
भारताने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत यश संपादन केले. या घवघवीत यशामध्ये चेतेश्‍वर पुजाराच्या धावांचा मोलाचा वाटा होता.

पॅट कमिन्स याबाबत म्हणाला, चेतेश्‍वर पुजाराविरुद्ध गोलंदाजी करायला आवडते. काही वेळा त्याला यश मिळते, तर काही वेळा मी बाजी मारतो. आगामी मालिकेत तो नसणार आहे, पण भारतीय संघात त्याच्यासारखी फलंदाजी करणाऱ्या खेळाडूची निवड करण्यात येईल.

ॲशेसप्रमाणेच ही मालिका
पॅट कमिन्सने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील कसोटी मालिकेला अनन्यसाधारण म्हटले आहे. तो म्हणाला, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियातील दोन कसोटी मालिका जिंकण्याची किमया करून दाखवली आहे, तसेच आम्हाला इंग्लंडविरुद्ध यश संपादन करता आले आहे.

त्यामुळे भारताविरुद्धची मालिका ही नेहमीच अव्वल दर्जाची ठरत आहे. आता तर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. त्यामुळे ॲशेस मालिकेप्रमाणेच या मालिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *