पोलिसांच्या वाहनातून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना रसद ? ; शरद पवार यांचा आरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ नोव्हेंबर ।। सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना रसद पुरवली जात आहे. त्यासाठी पोलिस दलाच्या गाड्या वापरल्या जात आहेत असे त्याच विभागातील अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळते आहे. माझ्याकडे खात्रीशीर माहिती नाही. माहिती असती तर मी वाट्टेल ते केले असते. परंतु माहिती नसल्याने भाष्य करता येत नाही असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याबाबत बोलताना पवार म्हणाले, राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणूनच माझी करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर मी गृहमंत्री होतो. चारदा मुख्यमंत्री असताना गृहखाते सांभाळले. मला गृहखात्याची चांगली माहिती आहे. चांगले कर्तबगार अधिकारी गृहखात्यात होते. राज्यात पहिल्यांदाच पोलिस महासंचालकांबाबत जाहीरपणे बोलले जात आहे. त्यांनी काय उद्योग केले. फोन टॅपिंगचा प्रकार झाला. खरे तर त्यातील सत्य बाहेर काढणे ही शासनाची जबाबदारी होती. पण ती न पाळता त्यांना एक्स्टेन्शन दिले गेले. याचा अर्थ यंत्रणा कशा वागतात, हे कळते. राज्य सरकारने वेगळी निती ठरवल्याचे यातून दिसते.

फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सरकारला वाटत असेल तर काळजी घेतली पाहिजे. पण जो गृहमंत्री आहे, त्यांना सुरक्षा दिली जाते, याचा अर्थ विषय गंभीर आहे, मी त्यावर भाष्य करणार नाही. त्यांना जी सुरक्षा दिली गेली तीच मला देण्यात येणार होती. पण मी ती नाकारली असे शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *