महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – ता. २ ऑगस्ट – वाहतुकीला शिस्त यावी आणि प्रवास निर्धोक व्हावा यासाठी केंद्र सरकार नवे नियम तयार करत आहे. प्रवास करतांना विशिष्ट दर्जाचं आणि सुरक्षित असलेलं हेल्मेटच घालणं आता बंधनकारक होणार आहे.
बाईक चालवितांना हेल्मेट घालण्याची सक्ती आहे. मात्र ते हेल्मेट कुठल्या दर्जाचं असावं यावर मात्र फारसं नियंत्रण नसंत. त्यामुळे अनेकदा खर्च टाळण्यासाठी स्वस्त हेल्मेट वापरण्याकडे अनेकांचा कल असतो.
अशा निकृष्ट हेल्मेटमुळे अपघातात काहीच फायदा होत नाही. उलट त्यामुळे इजाच होण्याची शक्यता असते.हेल्मेट हे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) यांनीच प्रमाणीत केलेले असावेत असे नियम करण्यात येणार आहे. BIS मार्क असलेले हेल्मेट घातले नाही तर दंड होणार आहे.
लोकांच्या सूचना आल्यानंतर त्यांचा अभ्यास करून नियमावली तयार केली जाणार आहे. 1 मार्च 2021 पासून नवे नियम लागू होणार आहेत.त्यामुळे आता बाईक चालवितांना डोक्यावर जुनं-पुराणं असलेलं फक्त नावालाच असलेलं हेल्मेट घालून आता चालणार नाही. नाही तर मोठा दंड भरावा लागणार आहे
या आधीही सरकारने बाईक चालविणाऱ्यासाठी नवे नियम केले होते. गाडीवर मागे बसणाऱ्याला हँडलची व्यवस्था आता करावी लागणार आहे.बाईक तयार करणाऱ्या कंपन्या आणि हेल्मेट उत्पादकांनाही आता आपलं उत्पादन दर्जेदार आणि जागतिक नियमांना अनुकूलच असावं याची काळजी घ्यावी लागणार आहे.