महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? या नेत्याचा निवडणूक आयोगाला सवाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१ डिसेंबर ।। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले पण आता विरोधकांकडून ईव्हीएमबदद्ल शंका व्यक्त केली जात आहे. बाबा आढाव यांनीही निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमच्या विश्वासार्हसंदर्भात शंका उपस्थित करत आत्मक्लेश उपोषण केले. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये आकडेवारी मांडत केंद्रीय निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले पाहिजे की 13 लाख अतिरिक्त मते का आहेत? महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? ईव्हीएमचे स्वतंत्र ऑडिट केले जात आहे का? असे अनेक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये केले आहेत.

“महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना!” .मथळ्याखाली ही पोस्ट केली असून यात म्हटले आहे की, ECI नुसार, महाराष्ट्रातील एकूण मतदार 9,64,85,765 आहेत आणि यंदा मतदानाची टक्केवारी 65.02% होती. साधे गणित आहे – 65.02% of 9,64,85,765 = 6,27,35,044.4 परंतु ECI ने 6,40,88,195 लोकांनी मतदान केल्याची नोंद केली आहे. यात अतिरिक्त 13,53,151 मते आहेत. इतकेच नाही, तर 65.02% केल्यास त्यात 0.4 मतं असं गणित येतं. राज्यातच काय, संपूर्ण विश्वात अपूर्णांक मतं कशी असू शकतात?13 लाख अतिरिक्त मते आली कुठून? असा सवाल आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे पोस्टमध्ये लिहितात की, आता मतदार नोंदणी पाहू. 2019 ते 2024 (5 वर्षे) महाराष्ट्रातील मतदारांची संख्या 50 लाखांनी वाढली, म्हणजे सरासरी प्रतिवर्षी 10 लाख. पण 2024 च्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या 6 महिन्यांत मतदारांची संख्या 42 लाखांनी वाढली. 6 महिन्यांत 42 लाख वाढ म्हणजे 84 लाख/वर्षाचा वाढीचा दर, जो गेल्या 5 वर्षांतील सरासरी वार्षिक दराच्या 8.4 पट आहे!हा मतदार नोंदणीचा चमत्कार आहे कि मतांमध्ये फेरफार आहे, हे तुम्हीच ठरवा.

मतांमधील या विसंगती दोन गंभीर प्रश्न निर्माण करतात, मतं वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का? ECI चुकीचा किंवा फेरफार केलेला डेटा प्रकाशित करत आहे का?दोघांपैकी काही जरी झालं असेल, तरी हा प्रकार निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी करतोय. 13 लाख अतिरिक्त मते का आहेत? महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? ईव्हीएमचे स्वतंत्र ऑडिट केले जात आहे हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले पाहिजे, असे आव्हाड यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

आव्हाड शेवटी पोस्टमध्ये म्हणतात की, लोकशाही ही लोकांच्या विश्वासावर अवलंबून असते. हे प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास त्यावरून नक्कीच विश्वास उडेल. मतदार नोंदणी आणि मतमोजणीत पारदर्शकता आणावी अशी आमची मागणी आहे. लपवण्यासारखे काहीही नसेल, तर निवडणूक आयोगाने या तपासणीचे स्वागत केले पाहिजे. आपल्या लोकशाहीच्या पायाचे रक्षण करण्याची प्रचंड गरज आज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *