UPI युजर्स 1 एप्रिलपासून ‘या’ फोन नंबरवरुन पेमेंट होऊ शकणार नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २१ मार्च ।। युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 1 एप्रिल 2025 पासून नवीन नियम लागू केले जाणार आहेत. ज्याचा थेट फटका गुगल पे, फोन पे आणि पेटीएमसारख्या पेमेंट अॅप्स युजरवर पडणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने दिलेल्या माहितीनुसार, UPI लिंक असलेल्या पण कित्येक महिन्यांपासून बंद असलेले ते मोबाईल नंबर बँक अकाउंटमधून हटवण्यात येणार आहे. याचाच अर्थ तुमचं बँक अकाउंट एखाद्या इनअॅक्टिव्ह नंबरवर लिंक आहे तर ते डिलीट करण्यात येईल. त्यानंतर त्या नंबरवरुन कोणतेही यूपीआय पेमेंट होऊ शकणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून देशात सायबर क्राइमच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळंच NPCI ने नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, इनअॅक्टिव्ह असलेल्या क्रमांकांमुळे, UPI आणि बँकिंग प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड आहे. टेलिकॉम ऑपरेटर इतर वापरकर्त्यांनाइन इनअॅक्टिव्ह नंबर देतात, ज्यामुळे फसवणुकीचा धोका वाढतो. यासोबतच, NPCI ने बँका आणि UPI अॅप्सना दर आठवड्याला इनअॅक्टिव्ह मोबाइल नंबरच्या नोंदी सुधारण्यास सांगितले आहे.

या युजर्सना फटका बसणार
या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम त्या वापरकर्त्यांवर होईल ज्यांनी नवीन मोबाईल नंबर घेतला आहे, परंतु त्यांचे बँक खाते अजूनही जुन्या नंबरशी जोडलेले आहे. याशिवाय, जे वापरकर्ते त्यांच्या निष्क्रिय मोबाइल नंबरसह UPI वापरत आहेत त्यांना देखील या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागेल. जर तुमचे बँक खाते जुन्या नंबरशी किंवा आता सक्रिय नसलेल्या नंबरशी जोडलेले असेल, तर तुमचा नंबर बँक खात्याशी अपडेट करा. तसेच, तुमच्या टेलिकॉम सेवा प्रदात्याशी संपर्क साधून इनअॅक्टिव्ह नंबर सक्रिय केला जाऊ शकतो. एकदा तुमचा नंबर सक्रिय झाला की, तुम्ही १ एप्रिल नंतरही पूर्वीप्रमाणेच UPI सेवा वापरू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *