Weather Update Today: ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा ! कसं असणार आजचं हवामान?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मे ।। महाराष्ट्रात यंदा मॉन्सूनने 12 दिवस आधीच दमदार एन्ट्री केली आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे मॉन्सूनचे वारे वेगाने पुढे सरकले असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. मात्र, पुण्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने आता काहीशी विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील.

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 30 मेपासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

जालना, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल.

पुण्यात पावसाचा तडाखा; वाहतूक कोंडी
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळी आकाश ढगाळ असले तरी पाऊस थांबला होता. मात्र, दुपारी तीननंतर पाषाण, कोथरूड, वडगाव शेरी, शिवाजीनगर, मगरपट्टा आणि कात्रज परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. वडगाव शेरी येथे सर्वाधिक 26 मिमी पावसाची नोंद झाली, तर हडपसर येथे 20 मिमी आणि लोहगाव येथे 18 मिमी पाऊस पडला. या पावसामुळे तुळशीबाग, अलका चौक, कर्वे रस्ता, टिळक रस्ता, नगर रस्ता आणि सातारा रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. तुळशीबागेत काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धांदल उडाली.

खडकवासला धरण परिसरात पावसाची रिपरिप
खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू आहे. बुधवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 5 या अकरा तासांत पानशेत धरणात 26 मिमी पाऊस पडला. वरसगाव येथे 21 मिमी, टेमघर येथे 13 मिमी आणि खडकवासला येथे 3 मिमी पावसाची नोंद झाली. मंगळवारी धरणसाठ्यात 0.13 अब्ज घनफूट वाढ झाली होती, परंतु बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्याने साठ्यात वाढ झाली नाही. सध्या चारही धरणांमध्ये एकूण 5.71 अब्ज घनफूट (19.60%) पाणीसाठा शिल्लक आहे, जो मागील वर्षीच्या 5.58 अब्ज घनफूट (19.14%) पेक्षा किंचित जास्त आहे.

विदर्भात मॉन्सूनची दमदार एन्ट्री
विदर्भात मॉन्सूनने बुधवारी गडचिरोलीमार्गे अधिकृत एन्ट्री केली. तब्बल 45 वर्षांनंतर प्रथमच मे महिन्यात मॉन्सून विदर्भात दाखल झाला आहे. हवामान विभागाचे संचालक डॉ. प्रवीणकुमार यांनी सांगितले की, 1980 नंतर पहिल्यांदाच मॉन्सून मे महिन्यात विदर्भात पोहोचला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईतही पावसाची हजेरी
महामुंबईतील कुलाबा, दादर, पवई आणि बोरिवली परिसरात बुधवारी चांगला पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यात सरासरी 11.05 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, रायगड, पालघर आणि नवी मुंबईत पावसाने उसंत घेतली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवेवर परिणाम झाला आणि अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

पुढील आठवड्याचा अंदाज
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवारपासून (30 मे) पावसाची तीव्रता कमी होईल. पुढील आठवडाभर आकाश ढगाळ राहून हलक्या सरी पडतील. यामुळे पुणेकरांना पाणी साचण्याच्या समस्येपासून काहीसा दिलासा मिळेल. तथापि, कोकणातील शेतकरी आणि मच्छिमारांनी सावध राहणे गरजेचे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *